स्वच्छ भारत अभियानाच्या गीताला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने स्वरसाज चढवला आहे. स्वच्छ भारत मोहिमेचे शीर्षक गीत तयार करण्यात आले असून ते शंकर -एहसान- लॉय या त्रयीने संगीतबद्ध केले असून शंकर महादेवन व इतरांनी गायले आहे, त्यात सचिनचाही समावेश आहे. दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीला हे गीत प्रसृत केले जाणार आहे.
नागरी विकास मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक वलयांकित (सेलेब्रिटीज) व्यक्तींनी या स्वच्छ भारत अभियानाच्या गीतात सहभाग घेतला आहे व समूहगान केले आहे. स्वच्छ भारत हे जनआंदोलन करण्यात यावे, या पंतप्रधानांच्या हाकेला त्यांनी साद दिली. हे गीत प्रसून जोशी यांनी लिहिले असून निर्मिती मुकेश भट्ट यांची आहे. तेंडुलकर याने यातील काही ओळी गायल्या असून त्याने संगीत मुद्रणाच्यावेळी काही सूचनाही केल्या.