ऑस्ट्रेलियावर मात करुन महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या मिताली राजच्या टीम इंडियाचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. अंतिम सामन्याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने महिलांच्या संघाला विजयासाठी खास कानमंत्र दिला आहे.

” जर आम्ही जिंकलो किंवा हरलो तर पुढे काय होईल याचा अजिबात विचार करु नका. तुम्ही आतापर्यंत खूप चांगला खेळ करत आला आहात. कोणततरी एक गोष्ट तुम्हाला आज विजय मिळवून देईल. कदाचीत एखादा झेल, एखादा रन आऊट, एखाद्या खेळाडूची सुरेख गोलंदाजी कोणतीही बाब तुम्हाला विजय मिळवून देईल. त्यामुळे शांत राहून खेळ केला तर आपला विजय नक्की आहे ”, असं महेंद्रसिंह धोनी म्हणाला. चेन्नईत सुरु असलेल्या तामिळनाडू प्रिमीअर लिग स्पर्धेच्या उद्घाटनावेळी धोनी बोलत होता.

अंतिम सामन्यात भारतीय महिलांचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडच्या धावगतीला वेसण घातली आहे. त्यामुळे या सामन्यात मिताली राजचा भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.