प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचे मत सध्याच्या घडीला अनेक तरुण-तरुणींच्या गळ्यातील तो ताईत आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकातील त्याची अद्भुत कामगिरी, भारतीय संघातील संधी, आयपीएलमधील प्रवेश आणि दमदार कामगिरीच्या जोरावर पटकावलेले भारताचे कसोटी कर्णधारपद, एवढे सारे होऊनही विराट कोहली भरकटलेला नाही. त्याचे पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी ही गोष्ट द्रोणाचार्य पुरस्कार घोषित झाल्यावर अधोरेखित केली. ‘दहा वर्षांचा असताना विराट जसा सरावाला यायचा, तसाच सराव तो अजूनही करतो. विराटसाठी क्रिकेट सर्वकाही आहे,’ असे मत राजकुमार यांनी व्यक्त केले. राजकुमार यांनी आपल्या मुलाप्रमाणेच विराटचा सांभाळ केला. त्याला मार्गदर्शन करत असताना तो क्रिकेटपटू आणि माणूस म्हणून कसा मोठा होईल, हे त्यांनी पाहिले. विराटच्या यशामध्ये राजकुमार यांचे अमूल्य योगदान पाहूनच त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला आहे. ‘१९ वर्षांखालील विश्वचषकानंतर तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासोबत करारबद्ध झाला. त्या वयामध्ये एक पालक या नात्याने त्याला सांभाळण्याची गरज होती. कोणत्याही खेळात फक्त पैसा महत्वाचा नसतो, तर आपल्या खेळातील सातत्य महत्वाचे असते, ही मी त्याला समजावले. ती भूमिका मी यशस्वीरीत्या बजावली. त्याला योग्य ते मार्गदर्शन केले,’ असे राजकुमार म्हणाले. तुम्हाला द्रोणाचार्य पुरस्कार मिळणारच विराटला २०१३ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी मी राष्ट्रपती भवनामध्ये विराटसह उपस्थित होतो. पुरस्कार मिळाल्यावर विराट माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तुम्हाला पुढच्यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार मिळणारच. त्याचे हे बोल आता सत्यात उतरत आहेत. २९ ऑगस्टला पुरस्कार प्रदान होणार असून विराट या कार्यक्रमाला उपस्थित राहावा, अशी माझी इच्छा आहे. विराटसारखे खेळाडू बनवण्याची जबाबदारी द्रोणाचार्य पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच. हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. पण या पुरस्काराने जबाबदारीही वाढली आहे. फक्त एकाच विराटवर अवलंबून न राहता बरेच विराटसारखे खेळाडू बनवण्याची जबाबदारी आता माझ्यावर असेल. कोहलीकडून अभिनंदन भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचे द्रोणाचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ‘अभिनंदन राजकुमार सर. बऱ्याचदा यशस्वी व्यक्तीमागे अथक मेहनत घेणाऱ्या लोकांना मानसन्मान मिळत नाहीत. पण तुम्हाला द्रोणाचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद झाला आहे,’ असे कोहली म्हणाला. शर्मा यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाली असून २९ ऑगस्टला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शर्मा यांच्याबरोबर ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारी भारताची महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनाही द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागापुरी रमेश (अॅथलेटिक्स), सागर दयाल (बॉक्सिंग), एस. प्रदीप कुमार (जलतरण) आणि महाबीर सिंग (कुस्ती) यांना पुरस्कार घोषित झाले आहेत. अजूनही माझे ऐकतो विराटची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होताना दिसते. पण असे असले तरी तो अजूनही माझे ऐकतो. त्याला बऱ्याच गोष्टींमध्ये मी मार्गदर्शन करत असतो. माझे म्हणणे पूर्णपणे ऐकून त्यावर तो अमंलबजावणी करतो. विराट परिपक्व झाला काही गोष्टी प्रशिक्षकाच्या हातामध्ये नसतात. परिपक्वता ही वयानुसार येत असते. विराटही स्वत:हून परिपक्व झाला आहे. ही स्वत:ला उमगण्याची प्रक्रिया असते. विराट या प्रक्रियेमधून गेला आहे. लहान मुलापासून ते कसोटी कर्णधारपद, या प्रवासात तो परिपक्व झाला आहे. मुलाप्रमाणे सांभाळले प्रत्येक प्रशिक्षक खेळाडूचे पालक असतात. त्याचप्रमाणे मी त्याला सांभाळले आहे. क्रिकेटचे मार्गदर्शन करण्याबरोबरच मी त्याला आयुष्यात यश-अपयश मिळाल्यावर काय करायला हवे, हेदेखील सांगितले. त्यामुळे यश किंवा अपयश आल्यास विराटचे लक्ष विचलित होत नाही.