तरुण दिग्दर्शकांच्या फळीतलाच एक महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणजे निखिल महाजन. नवी कोरी जोडी, श्रेयसचं मराठीत पुनरागमन, जितेंद्र जोशीने वठवलेला खलनायक, कथा, अ‍ॅक्शन या साऱ्यामुळे ‘बाजी’ हा त्याचा आगामी सिनेमा चर्चेत आहे.

तू कॉम्प्युटर इंजिनीअर आहेस. तरी या क्षेत्राकडे वळण्याचं काही खास कारण?
हो. मी कॉम्प्युटर इंजिनीअर आहे. माझ्या घरी माझे आई, बाबा, आजी, आजोबा असे सगळेच पीएच.डी. आहेत. त्यामुळे घरात शिक्षणाचं वातावरण आहे, पण मला लहानपणापासूनच सिनेमा बघण्याची प्रचंड आवड lp45होती. माझं मन तिथे रमतं. मग मी ठरवलं की, या क्षेत्रात करिअर करायचं. पण, करिअर करायचं तर त्यातलं शास्त्रशुद्ध शिक्षण असायला हवं. म्हणून मी ऑस्ट्रेलियात जाऊन सिनेमा या विषयीचं तांत्रिक शिक्षण घेतलं. मला वाटतं, कोणत्याही क्षेत्रात जाण्याआधी त्याचं तंत्र शिकून घेणं महत्त्वाचं असतं. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी ‘पुणे ५२’ हा पहिला सिनेमा स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला. मी कधीच कुणाकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं नाही.
‘बाजी’ सिनेमातल्या कलाकारांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यांच्या निवडीबाबत काय विचार केला होतास?
सिनेमाच्या नायकामध्ये निरागसता हवी होती. ती मला श्रेयसमध्ये आढळली. श्रेयस मराठी सिनेमा करत नाही असं ऐकलं होतं, पण जेव्हा मी त्याला ‘बाजी’ची कथा ऐकवली तेव्हा त्याने पंधरा मिनिटांत सिनेमा करण्यास होकार दिला. अमृता खानविलकरला मला खरं तर ‘पुणे ५२’च्या वेळीच घ्यायचं होतं. पण, तेव्हा तारखा जमून आल्या नाहीत. तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे इंडस्ट्रीत तिची एक विशिष्ट प्रतिमा तयार झाली आहे. त्यानुसारच तिला भूमिका मिळत आल्या आहेत. तिची तीच इमेज मला मोडायची होती. साध्या लुकमधली साधी अमृता याची कल्पना फारशी कोणी केली नसावी. तिचा ‘शाळा’ हा सिनेमा मी बघितला होता. त्यामुळे तिला घेण्याचं मी ठरवलं. जितेंद्र जोशी हा अप्रतिम अभिनेता आहे. ‘दुनियादारी’मध्ये त्याने साकारलेला खलनायक बघून या सिनेमासाठी त्याला खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारलं असं अजिबातच नाही. मला त्याचं काम आवडतं. तसंच सिनेमातल्या मरतड या खलनायकातही मला निरागसता हवी होती. ती जितेंद्रमध्ये सापडली.
‘बाजी’ लवकरच प्रदर्शित होतोय. किती उत्सुकता आहे?
उत्सुकता तर खूप आहे. गेली दोन र्वष या सिनेमावर काम सुरू होतं. माझ्या संपूर्ण टीमने त्यावर मेहनत घेतली आहे. सव्वा र्वष शूटिंग सुरू होतं. खरं तर गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच आम्ही सिनेमा प्रदर्शित करणार होतो. पण, काही कारणांमुळे तसं करता आलं नाही.
सिनेमाचं शूट साधारण चारेक महिन्यांमध्ये होतं. पण, ‘बाजी’साठी तू सव्वा र्वष शूट केलंस?
सलग सव्वा र्वष शूट केलेलं नाही. काही दिवस, महिने शूट करून मध्येच काहीसा ब्रेक घेत शूट करण्यात आलं आहे. तसंच सिनेमाच्या कथेच्या मागणीनुसार श्रेयस आणि जितेंद्र यांच्यातले शारीरिक बदल होणं अपेक्षित होतं. त्यासाठी त्यांना व्यायाम करायला वेळ देणं महत्त्वाचं होतं. पण, शूटदरम्यान श्रेयसला दुखापत झाली होती. त्याच्या खांद्याला मार लागला होता. त्यामुळे त्याला म्हणावा तितका व्यायाम करता येत नव्हता. तसंच त्याची दुखापत बरी होणंही आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. म्हणून संपूर्ण शूटला सव्वा र्वष लागलं. प्रत्यक्ष शूट आम्ही साठेक दिवस केलं आहे.
अलीकडे इंडस्ट्री म्हणजे सिनेमांची फॅक्टरी झाली आहे, असं म्हटलं जातं. चार ते पाच महिन्यांत सिनेमा प्रदर्शनासाठी तयार असतो. अशा परिस्थितीत कमी वेगाने सिनेमा करणं तुला पटतं का?
माझ्याकडे खूप वेळ आहे. मला घाईत, चार महिन्यांत सिनेमा झालाच पाहिजे अशा ओझ्याखाली काम करता येत नाही. चारेक महिन्यांमध्ये सिनेमा करणाऱ्यांचं मला कौतुक वाटतं. पण, असं काम करणं मला शक्यच नाही. सिनेमा तयार होण्यासाठी कमीतकमी आठ महिने तरी लागावेत. जेणेकरून तुम्ही त्यावर बारकाईने काम करू शकाल.
दोन वर्षांपूर्वी ‘पुणे ५२’ हा तू दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. त्यानंतर आता ‘बाजी’. हा दोन वर्षांचा गॅप तू ठरवून घेतलास का?
ठरवून इतक्या वर्षांचा ब्रेक अजिबात घेतलेला नाही. ‘बाजी’सारखा सिनेमा कमी वेळात बनणण्यासारखा मुळीच नाही. त्यासाठी भरपूर वेळ देऊन काम करणं गरजेचं होतं. त्यामुळे नियोजन करून प्रत्येक गोष्टीला पुरेसा वेळ देत सिनेमाचं काम पूर्ण झालं.
‘पुणे ५२’ हा सिनेमा वेगळ्या धाटणीचा असूनसुद्धा त्याला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. याचं कारण काय?
कारण माहीत नाही. पण, दोन वर्षांनंतरही हा सिनेमा प्रेक्षकांच्या लक्षात आहे. वेगवेगळ्या फेस्टिव्हल्समध्ये तो आजही दाखवला जातो. एक गोष्ट आवर्जून सांगू शकतो की, ‘पुणे ५२’च्या वेळी आलेले इतर सिनेमे प्रेक्षकांना कदाचित आठवणारही नाही. पण, तो सिनेमा मात्र आठवणीत आहे. त्यामुळे तेव्हा बॉक्स ऑफिसवर तो सिनेमा यशस्वी झाला नसेल पण, तो लक्षात राहिलाय हे मात्रं खरं.
‘बॉक्स ऑफिस हिट’ हा मुद्दा तुला किती महत्त्वाचा वाटतो?
माझ्यासाठी हा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे. कारण सिनेमा हा एक केवळ आर्ट फॉर्म नसून कमर्शिअल आर्ट फॉर्म आहे. एक सिनेमा बनवायला खूप पैसे लागतात. चांगला सिनेमा काढायचा असेल तर अमाप पैसा लागतो. काही वेळा त्यासाठी ठरवलेलं बजेट वाढत जातं. प्रचंड मेहनत करून सिनेमा बनवल्यानंतर तो प्रेक्षकांनी बघावा, त्यांना तो आवडावा ही माफक अपेक्षा सिनेमाच्या टीममधल्या प्रत्येकालाच असते. त्यामुळे बॉक्स ऑफिस हिट हे महत्त्वाचं वाटतं.
‘बाजी’कडून बॉक्स ऑफिस हिटची काय अपेक्षा आहे?
खरं सांगायचं तर, खरंच आता काहीच सांगता येणार नाही. प्रचंड मेहनत घेऊन सिनेमा बनवलाय. तो प्रेक्षकांना आवडावा ही इच्छा आहे.
‘बाजी’चा यूएसपी काय म्हणता येईल?
सिनेमा ‘वेगळा’ आहे असं उत्तर मी देणार नाही. कारण हा शब्द आता सर्रास वापरला जातो. ‘बाजी’ मनोरंजन करणारा सिनेमा आहे. सरधोपट व्यावसायिक सिनेमा नाही. अ‍ॅक्शन सीन्स, गाणी, चांगल्या दर्जाचे व्हीएफएक्स इफेक्ट्स, कलाकार असं सगळं काही सिनेमात मनोरंजन करतं. मनोरंजन करणारा सिनेमा म्हणजे त्यात कथा दुय्यम मानली जाते. पण, या सिनेमात कथा ही पहिल्या स्थानावर आहे. कारण कथा उत्तम असायलाच हवी. कथा सिनेमाचा आत्मा असते. त्याशिवाय सिनेमा उभाच राहू शकत नाही.
तू आता उल्लेख केलास त्याप्रमाणे अ‍ॅक्शन सीन्स, गाणी, इफेक्ट्स असं मनोरंजनाचं पॅकेज हिंदी सिनेमांमध्ये अधिक बघायला मिळतं. मराठीकडेही हे पॅकेज आता सरकतंय असं म्हणू शकतोस?
सिनेमाची कथा ही उत्तम असायलाच हवी. सिनेमाचा पाया म्हणून कथेकडे गांभीर्याने बघितलं जातंच. पण, मला वाटतं हे पॅकेज आपल्याकडे आधीपासूनच होतं. त्याचं स्वरूप काहीसं बदलतंय हा एवढाच फरक आहे. पण, हा बदल चांगला आहे. एका अर्थाने आपला सिनेमा हिंदीशी स्पर्धा करू पाहतोय. एकाच दिवशी मराठी आणि हिंदी असे दोन्ही सिनेमे रिलीज होणार असतील आणि प्रेक्षकांना मराठी सिनेमा बघू की हिंदी असा प्रश्न पडत असेल तर ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. हिंदीतल्या शाहरुख, सलमान अशा बडय़ा स्टार्सच्या सिनेमांसोबत मराठी सिनेमेही प्रदर्शित होतात. पण, त्याच वेळी प्रदर्शित होणाऱ्या मराठी सिनेमांमध्ये उत्तम कथा असली तर प्रेक्षक नक्कीच मराठी सिनेमांनाच पसंती देतो.
हिंदीशी तुलना करतोय असं म्हणालास. ‘बाजी’सोबत त्याच दिवशी अमिताभ बच्चन यांचा ‘षमिताभ’ही प्रदर्शित होतोय. याबाबत काय सांगशील?
अमिताभ बच्चन यांच्यासोबत कोणीच स्पर्धा करू शकत नाही. व्यक्ती आणि अभिनेता म्हणून ते खूप मोठे आहेत. शिवाय दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या बाजाचे आहेत. त्यामुळे त्यांचा प्रेक्षकही वेगवेगळा असणार. त्यामुळे स्पर्धा म्हणून बघत नाही.
पण, सिनेमा करताना त्याच्या प्रदर्शनाच्या तारखांचाही अभ्यास करणं किती महत्त्वाचं वाटतं?
हो. निश्चितच त्याकडे लक्ष ठेवावं लागतं. इंडस्ट्रीतल्या चांगल्या संबंधाचा अशा वेळी वापर करून या तारखांविषयी आधीच चर्चा केली जाते. आपल्या सिनेमाच्याच वेळी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाच्या टीमशी याबाबत बोलून तारखा बदलण्यात सामंजस्याने निर्णय घेतला जातो. याविषयी भीती, काळजी असतेच. पण, प्रत्येक सिनेमा त्याचं नशीब घेऊन येतो असं मला वाटतं. त्या सिनेमासाठी भरपूर मेहनत घेतलेली असते. पण, शेवटी प्रेक्षकांवर सगळं अवलंबून असतं. आपल्या हाती फक्त चांगला सिनेमा करणं एवढचं असतं.
हिंदी-मराठीसारखीच स्पर्धा आता मराठीतल्याच नवनव्या तरुण दिग्दर्शकांमध्येही दिसून येतेय. नागराज मंजुळे, ओम राऊत, अविनाश अरुण, आदित्य सरपोतदार अशी अनेक नावं आता इंडस्ट्रीमध्ये स्थिरावतायत. तू या स्पर्धेकडे कसा बघतोस?
– हे सगळे दिग्दर्शक खूप हुशार आहे. चित्रपट माध्यमाची जाण असलेले आहेत. आम्ही सगळे एकमेकांचे चांगले मित्रही आहोत. त्यामुळे आमच्यात अशी स्पर्धा नाही. असलीच तर ती प्रॉडक्शन हाऊस किंवा सिनेमांमध्ये असेल. त्याचंही कारण बॉक्स ऑफिस हे आहे, पण दिग्दर्शकांमध्ये अशी स्पर्धा वाटत नाही. जरी कधी जाणवली तरी ती निकोप स्पर्धा असते. आम्ही एकमेकांना आमची प्रामाणिक मतं सांगत असतो. एखादी गोष्ट आवडल्यावर जसं कौतुक करतो तसंच एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याबाबत त्या दिग्दर्शकाकडे नापसंतीही दर्शवतो. त्यामुळे आम्हाला एकमेकांबाबत असुरक्षित वाटत नाही. इंडस्ट्रीतल्या काही मोठय़ा लोकांचं मी नेहमी मार्गदर्शन घेत असतो. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांना मी नेहमी माझ्या सिनेमाचा रफ कट दाखवतो.
पुढचे प्रोजेक्ट्स काय आहेत?
‘बाजी’नंतर पुढच्या सिनेमाचं विचारसत्र सुरू झालंय. पण, त्याचं काम प्रत्यक्षात सुरू व्हायला वेळ लागेल. हिंदीमध्ये ‘दैनिक’ हा हिंदी सिनेमा करणार आहे. लवकरच त्याचं काम सुरू होईल. त्यात काजकुमार राव हा अभिनेता काम करतोय. दोन हिंदी सिनेमांची निर्मितीही करतोय. मोहित टाकळकर यांचा ‘मीडियम स्पाइसी’ हा त्यापैकी एक. या सिनेमाची कथा मला खूप आवडली. चांगल्या कथेच्या सिनेमाची निर्मिती मी करायला हवी असं मला वाटलं म्हणून या चित्रपटासाठी मी निर्मात्याची धुरा उचलतोय. तसंच वरुण ग्रोव्हर यांचा ‘माँ भगवतीया आयआयटी कोचिंग’ याही सिनेमांची निर्मिती करतोय. शिवाय मराठीमध्ये प्रेमकथा, रहस्य, हॉरर अशा बाजाचे चित्रपट करायला आवडतील.
चैताली जोशी