स्वतंत्र विदर्भाच्या मुदद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी शनिवारी नागपूरमध्ये प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी एखाद्या मारेकऱ्याकडून माझी हत्या करवून घेतली नाहीतर मी माझ्या वयाची शंभरी पूर्ण करेल, असे वैद्य यांनी म्हटले. राज यांनी काल शिवाजी पार्कवरील सभेत वैद्य यांनी उद्देशून ज्यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ आली ते स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याची भाषा करतात, असे म्हटले होते. राज यांच्या याच टीकेला मा. गो. वैद्य यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्या जगातून जाण्याची वेळ आली, असे राज यांनी म्हटले. मला आणि त्यांना दोघांनाही एक दिवस या जगातून जायचे आहे. मात्र, माझी सध्याची प्रकृती पाहता मी आणखी सात वर्षे म्हणजे माझ्या वयाची शंभरी पूर्ण करेन, असे वाटते. राज ठाकरे यांनी माझ्यावर गोळ्या झाडायला एखाद्याला पिस्तूल घेऊन पाठवले नाहीतर मी नक्कीच माझी शंभरी साजरी करेन, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, मा.गो.वैद्य यांनी लहान राज्यांच्या आपल्या मागणीचा पुनरूच्चार करताना नवीन राज्य पुर्नरचना आयोगाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. किमान ५० लाख लोकसंख्येचे राज्य निर्माण करण्याची गरज आहे. राज्य वेगळे झाले तरी भाषा एकच असेल. वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्यांसाठी भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय?, असा सवालही वैद्य यांनी यावेळी उपस्थित केला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2016 रोजी प्रकाशित
…तर मी १०० वर्षे जगेन; मा.गो.वैद्यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
राज्य वेगळे झाले तरी भाषा एकच असेल. वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्यांसाठी भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय?, असा सवालही वैद्य यांनी यावेळी उपस्थित केला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-04-2016 at 12:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss leader mg vaidya hits back raj thackeray over separate vidarbha issue