छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला साडेतीनशे वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करून सिंधुदुर्ग किल्ला पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न राहील. तसेच विजयदुर्ग बंदरात जहाजबांधणी उद्योग आणण्याचा विचार शिक्षण व सांस्कृतिकमंत्री ना. विनोद तावडे यांनी मालवण येथे व्यक्त केला. सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवात ना. तावडे बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर व अधिकारी उपस्थित होते.पर्यटन महोत्सव आयोजन करण्याचा हंगाम चुकला आहे. त्यामुळे पर्यटक स्थानिक लोक बनल्याने त्यांच्याच खिशातील पैसे खर्च होणार आहेत. खरे तर पर्यटन महोत्सव गुजरात, कर्नाटक, केरळ अशा राज्यांत जाऊन प्रचार केला तरच पर्यटक येतील, असे ना. विनोद तावडे म्हणाले. गुजरातमधील पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतील असेही त्यांनी सांगितले. देश-विदेशातील पर्यटक कोकणात यायला हवेत म्हणून नियोजन केले जाईल. चिपी विमानतळ पर्यटन विकासाला गती देणारे ठरेल असा विश्वास ना. विनोद तावडे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, शिवडीचा जहाजबांधणी उद्योग स्थलांतरित होणार आहे. हा उद्योग विजयदुर्ग बंदरात झाल्यास रोजगाराच्या मोठय़ा संधी उपलब्ध होतील. मुंबईकडे नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना थांबविण्यासाठी रोजगार देण्याचा उपक्रम हाती घेतला जाईल, असे ना. तावडे म्हणाले.सावंतवाडी-बांदा या भागात आयटी उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्गात या उद्योगासाठी पोषक वातावरण असून कोकण महाराष्ट्र राज्याला डॉलर देणारा प्रदेश आहे. सागरीकिनारा तर पर्यटनात आघाडी घेणार आहे. आंबा, काजू, मत्स्यउद्योग प्रक्रियांना प्राधान्य दिले जाईल, असे ना. विनोद तावडे म्हणाले.छत्रपती शिवरायांच्या सिंधुदुर्गला साडेतीनशे वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन निश्चित केले जाईल. पर्यटकांसाठी सिंधुदुर्गला प्राधान्य देतानाच जगाच्या नकाशावर सिंधुदुर्ग येण्यासाठी प्रयत्न राहील, असे ना. विनोद तावडे म्हणाले. अवघ्या कोकण विभागातच विकासाचे स्वप्न साकारू असे ते म्हणाले.