मांसाहारबंदीच्या वादावर आमच्या बाजूने पडदा पडला आहे. त्यामुळे आता इतरांनी वाद चिघळवू नये, अन्यथा नको ती परिस्थिती उद्भवेल, असा इशारा शनिवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून पर्युषण पर्वाच्या काळात मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आज हा इशारा दिला. तत्पूर्वी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये मांसविक्री बंदीच्या निर्णयावर माघार घ्यावी लागल्यामुळे जैन समाज काहीसा आक्रमक होताना दिसला. त्यासाठी शनिवारी मीरा-भाईंदरमध्ये तब्बल १० हजार जैन साधूंनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. तर जैन समाजातील मुनींनी ठाकरे बंधुंच्या वक्तव्यांचा निषेध करताना मुंबई आमचीही असल्याचे ठणकावून सांगितले. मुंबईच्या विकासात गुजराती आणि जैनांचे मोठे योगदान आहे. मुंबई जेव्हापासून आहे, तेव्हापासून आम्ही इथे आहोत, याला इतिहास साक्षी आहे पाकिस्तानात मुस्लिम राहतात म्हणून भारतातील सर्व मुस्लिमांना तिकडे पाठवता येईल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अशाप्रकारे भेदभाव करणे योग्य नसल्याचे बावन जिनालय मंदिराचे आचार्य सागरचंद्र सुरीश्वर यांनी सांगितले. मांसविक्री बंदीच्या निर्णयावर ठाकरे बंधूंनी भाजप आणि जैन समाजावर टीका केली होती. महाराष्ट्रात काय करायचे , हे जैन धर्मीयांनी ठरवायचे नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी मांसविक्री बंदीवरुन जैनांवर तोफ डागली होती. तर जैनांनो मुसलमानांच्या मार्गावर जाऊ नका अशा मथळ्याखाली 'सामना'त लेख लिहून शिवसेनेने पर्युषणातील मांसबंदीच्या मुद्द्याला आपला प्रखर विरोध दर्शवला होता.