‘जयपूर साहित्य महोत्सवात’ वहिदा रेहमान यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. वहिदा रेहमान यांचे मंचावर आगमन होत असताना ‘आज फीर जीने की तमन्ना हैं’ हे गाणे सुरू होते. उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह होता, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी वहिदा रेहमान यांचे स्वागत केले. यावेळी वहिदा रेहमान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचा सुरुवातीचा प्रवास, आवडते चित्रपट, दिग्दर्शक आणि सह-कलाकारंबरोबरचा कामाचा अनुभव यावर दिलखुलास गप्पा मारल्या.
अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वहिदाला कमी वयामुळे चित्रपटाच्या करारावर सहीदेखील करण्यास कायद्याने मुभा नव्हती. परंतु, गुरूदत्त यांच्या नाव बदलण्याच्या सल्याला तिने खंबिरपणे नकार दिला. त्यावेळी आपण खूप जिद्दी असल्याचे सांगत, या प्रसंगाची आठवण कथन करताना वहिदा म्हणाल्या, दिलीप कुमार आणि अन्य कलाकारांचे उदाहरण देत चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी मला नावात बदलण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, मी खंबिरपणे यास नकार दिला. त्यांच्या मते माझे भले मोठे नाव न भावणारे होते. यामुळे स्वत्वाला ठेच पोहोचल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली. वहिदाने नाव बदलण्यास सरळ सरळ नकार दिल्याने सीआयडी चित्रपटासाठी तिची निवड करण्यासाठी गुरूदत्त आणि राज खोसला यांना तीन दिवस लागले. १९५६ साली आलेला हा तिचा पहिला चित्रपट होता. ‘गाईड’, ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ हे आपले आवडते चित्रपट असल्याचे सांगत देवानंद, गुरूदत्त आणि अन्य सहकलाकारांविषयीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. सह-अभिनेत्रींविषयी बोलताना त्या म्हणाल्या, अभिनेत्री नंदा माझी जवळची मैत्रीण होती. गेल्या वर्षी अभिनेत्री नंदा यांचे निधन झाले.