अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्या ब्रेकअपच्या चर्चा थांबत नाहीत तोपर्यंत हे दोघे एकत्र आल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. संजय कपूरच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. दोघंही या पार्टीत अगदी मनमुराद गप्पा मारताना दिसले. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूडच्या या क्युट कपलला एकत्र आणण्यामागे दोन व्यक्तींचा हात आहे. यामधली पहिली व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक करण जोहर आणि दुसरी व्यक्ती आहे आलियाची जिवलग मैत्रिण आकांक्षा रंजन कपूर. करण आणि आकांक्षामुळेच सिद्धार्थ- आलिया यांच्यातील दुरावा मिटला आहे.

गेल्या आठवड्यात दिवाळीच्या भेटवस्तू देण्यासाठी मित्र-मैत्रिणींची एक यादी आलियाने कर्मचाऱ्याला दिली होती. या यादीत सिद्धार्थचं नाव नसतानाही त्या कर्मचाऱ्याने सिद्धार्थच्या घरी भेटवस्तू पाठवली. यासाठी आलिया त्या कर्मचाऱ्याला ओरडलीही होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आलियाने तिच्या जुहू इथल्या घरी मित्र-मैत्रिणींसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. तेव्हादेखील सिद्धार्थला तिने वगळलं. जेव्हा करण जोहरला ही माहिती मिळाली, तेव्हा सिद्धार्थ- आलियातील वाढता दुरावा पाहून त्यालाही दु:ख झाले. लगेचच दुसऱ्या दिवशी करणने या दोघांना लंचसाठी बोलावलं. आलियाची मैत्रीण आकांक्षासुद्धा लंचसाठी पोहोचली. करण आणि आकांक्षाने मिळून या दोघांची समजूत घातली. अखेर त्या दोघांनी नात्याला आणखी एक संधी देण्याचा विचार केला.

वाचा : काजोलचा मुलगा ‘ब्रह्मास्त्र’साठी करण जोहरसोबत करणार काम  

आकांक्षा रंजनने तिच्या नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. करण जोहर आणि आलियासोबत काढलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘दोघांना जुळवणारे..,’ असं तिने लिहिलं. त्यामुळे सिद्धार्थ- आलियाच्या पॅचअपसाठी करण आणि आकांक्षाने विशेष मेहनत घेतली असं म्हणायला हरकत नाही.