राज्यभरात महिलांच्या हक्कांसाठी आक्रमक आंदोलने करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई लवकरच टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो नेहमीच त्यामधील स्पर्धकांमुळे आणि रंजकतेमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. शनिशिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश असो, वा हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेश या कारणांमुळे तृप्ती देसाई गेल्या काही दिवसांत सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे टीआरपीचे गणित साधण्याच्यादृष्टीने तृप्ती देसाई यांना ‘बिग बॉस ९’साठी विचारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तृप्ती देसाई यांनी आयोजकांसमोर एक अट ठेवली आहे. ‘बिग बॉस’ चा आवाज जर महिलेचा असेल, तरच आपण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सकारात्मक विचार करु, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. ‘बिग बॉस’सारख्या व्यासपीठावरून महिलांच्या समानतेचा मुद्दा मांडता येत असेल, तर शोमध्ये सहभागी व्हायला हरकत नाही, असे देसाई यांनी म्हटले आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या ९व्या पर्वासाठी आयोजकांकडून स्पर्धकांची निवड सुरू असून आगामी पर्वात या कार्यक्रमात स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ, कुस्तीपटू कविता दलाल यांसारखी बहुचर्चित व्यक्तिमत्वे दिसण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमात बिग बॉसने केलेल्या सूचनांचे पालन करणे ही स्पर्धकांसाठी सक्तीची बाब असते. दहा पर्वांपासून सुप्रसिद्ध व्हॉईस आर्टिस्ट अतुल कुमार बिग बॉससाठी आवाज देतात. अतुल यांचा आवाज ही बिग बॉसची ओळख बनली आहे. मात्र हाच आवाज बदलण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे. त्यामुळे चॅनेल तृप्ती देसाईंना झुकते माप देणार का,  त्यांना डच्चू मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.