देशभरात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याचे पडसाद पुण्यात सुरू असलेल्या ६ व्या भारतीय छात्र संसदेतही पहायला मिळाले. एमआयटी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी हजेरी लावली होती. यावेळी नायडू यांना अभिनेता आमीर खान याने असहिष्णुतेसंदर्भात केलेल्या विधानाबद्दल त्यांचे काय मत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना नायडू म्हणाले की, आमीर माझा मित्र असला तरी त्याने ज्याप्रकारचे विधान केले होते ते माझ्या आणि समस्त देशवासियांच्या भावना दुखावणारे होते. याशिवाय, नायडू यांनी असहिष्णुतेच्या मुद्द्यावर होणाऱ्या चर्चेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रचंड बहुमत मिळालेल्या पंतप्रधानांना न स्विकारणे ही असहिष्णुता आहे का अन्य घटकांच्या भावनांचा विचार न करणे ही असहिष्णुता आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.