शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना बुधवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात 'महाराष्ट्र भूषण' हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीड, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. रोख रक्कम दहा लाख रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असते. छत्रपतींच्या खऱ्या सेवकांना कोणाची भीती वाटणे शक्य नाही. त्यामुळे कोणाच्याही भीतीमुळे पुरस्कार सोहळा राजभवनात केला नसून, देश आणि राज्यपातळीवरील सर्वोच्च पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्याची प्रथा आहे, म्हणून हा सोहळा राजभवनात आयोजित केल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. बाबासाहेबांना हा पुरस्कार देणाऱ्यास विरोध करणाऱ्यांनी प्रथम छत्रपती काय आहेत, हे समजून घेतले पाहिजे. त्यानंतरच छत्रपतींबद्दल बोलण्याचे धारिष्ट्य करावे, असे फडणवीसांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्यामागची भूमिका मांडली. महाराष्ट्रात रस्त्यावरील १० जणांना विचारलं तर बहुतांश जण सांगतील की मला शिवाजी महारांजाबद्दलची सर्वात पहिली माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातून मिळाली. मलाही शिवाजी महाराजांबद्दलची बरीच माहिती बाबासाहेबांच्या व्याख्यानातून आणि पुस्तकातूनच मिळाली. मात्र, आता त्यांच्याबद्दल ज्याप्रकारचे आक्षेप घेतले जात आहेत, ते अर्धा टक्काही खरे नाहीत हे शिवचरित्र वाचल्यावर कळेल. शिवचरित्र ठराविक एकदोन व्यक्तीमत्वांभोवती केंद्रित नव्हते तर अठरापगड जातीच्या लोकांनी मिळून स्वराज्य बनले हे मला शिवचरित्रातूनच कळाल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून उठलेल्या वादंगामुळे राजभवनातील दरबार हॉलमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याला निवडक २५० लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते.