चक्रीवादळसदृश घडामोडींचा परिणाम गेला महिनाभर सकाळच्या गुलाबी थंडीची सवय झालेल्या मुंबई, ठाणेकरांना रविवारी सकाळी मात्र घाम पुसत उठावे लागले. अंदमान बेटांच्या दक्षिणेला समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यामुळे वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळे वाढलेले बाष्पाचे प्रमाण त्यासाठी कारणीभूत ठरलेय. कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भातील तापमानातही ३ ते ५ अंश से.ने वाढ झाली असून ही वाढ आणखी दोन दिवस राहण्याचा अंदाज आहे. लांबलेला पावसाळा व त्यानंतर लगेचच सुरू झालेला गारवा यामुळे या वर्षी मुंबईकरांना ऑक्टोबर हीटचा तडाखा बसला नाही. नोव्हेंबर महिन्यात मध्य महाराष्ट्रातील तापमान तर अनेकदा १० अंश से.खाली गेले होते. अहमदनगर, पुणे, नाशिक, धुळे येथील तापमान सातत्याने १० अंश से.च्या दरम्यान राहिले. मुंबईतही नोव्हेंबरमध्ये चार वेळा किमान तापमान १६.४ अंश से.पर्यंत उतरले होते. डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढतो असा अनुभव आहे. मात्र डिसेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात मुंबईकरांना घाम फुटला आहे. त्याला कारणीभूत ठरताहेत ते बंगालच्या उपसागरावरून भरपूर बाष्प घेऊन येणारे वारे. गेल्या आठवडय़ात दिवसा उत्तर आणि वायव्येकडून वारे वाहत होते, तर रात्रीच्या वेळी पूर्वेकडून किंवा ईशान्येकडून वारे राज्यात येत. त्यामुळे गारवा होता. मात्र आता आग्नेय दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागांत दिवसा व रात्रीचे तापमान वाढले आहे.कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी रात्रीच्या सरासरी तापमानात ३ ते पाच अंश से.ने वाढ झाली. रविवारी मुंबईत सांताक्रूझ येथे किमान २२.६ अंश से., तर कुलाबा येथे २४.५ अंश किमान तापमान होते. कमी दाबाचे क्षेत्र तयार अंदमान बेटांच्या दक्षिणेला व सुमात्रा बेटांच्या वर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील २४ तासांत या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. या चक्रीवादळसदृश घडामोडींमुळे पूर्व तसेच आग्नेयकडून येणारे बाष्पयुक्त वारे अधिक प्रभावी ठरत आहेत.