रेल्वेतील अस्वच्छता आणि गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना नेहमीच बसतो. प्रवासी संघटनांपासून समाजमाध्यमांपर्यंत हरएकप्रकारे याबद्दलच्या तक्रारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. मात्र यात अजूनपर्यंत काहीच सुधारणा न झाल्याने प्रवाशांना रोजच सहन करावा लागणारा हा मनस्ताप अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्या वाटय़ालाही आला. मुंबई-लातूर हा लांबलेला प्रवास आणि या कंटाळवाण्या प्रवासात उंदराने त्यांची पर्स कुरतडल्यामुळे संतापलेल्या निवेदिता यांनी याविरोधात रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती दिली. लातूर येथील नाटकाच्या प्रयोगासाठी निवेदिता सराफ या २२ सप्टेंबर रोजी लातूर एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. एसी सेकंड क्लासमधून त्या प्रवास करत होत्या. रात्री झोपताना त्यांनी पर्स डोक्याखाली ठेवली होती. सकाळी लातूर स्थानकात उतरत असताना पर्स पाहिल्यानंतर रात्री उंदराने ती पर्स कुरतडल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा अनुभव कमी होता म्हणून की काय लातूरहून मुंबईच्या परतीच्या प्रवासातही त्यांना रेल्वेच्या गलथान कारभाराचा फटका बसला. लातूर एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा पाच तास उशिराने आली. त्यातही टीसीने त्यांची आरक्षित जागा दुसऱ्याच महिलेला दिली होती. मुंबईत येतानाही बदलापूर-अंबरनाथ स्थानकादरम्यान गाडी दीड तास खोळंबली होती. अखेर सकाळी १० वाजता चित्रीकरणासाठी पोहोचायचे असल्याने त्यांना ठाणे स्थानकात उतरून पुढचा प्रवास करावा लागला. लातूर एक्स्प्रेस अत्यंत गलिच्छ असल्याने यापुढे मराठवाडय़ात प्रवासच करणार नाही, असे त्यांनी वैतागून सांगितले.