मुंबईमध्ये क्षय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असतानाच पालिकेच्या क्षय रुग्णालयातील रुग्णांना सकस आहाराऐवजी चहात बुडवून खाण्यासाठी पाव देण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच आठवडय़ातून केवळ दोन दिवस रुग्णांना अंडी दिली जात आहेत. परिणामी, रुग्णांची तब्येत सुधारण्याऐवजी बिघडण्यास आमंत्रण मिळत आहे. या प्रश्नाला नगरसेवकांनी आरोग्य समितीच्या बैठकीत वाचा फोडली. मात्र रुग्णांना सकस आहार दिला जाईल, अशी पुन्हा एकदा प्रशासनाने जाहीर केले. नगरसेवकांचे मात्र या उत्तराबाबत समाधान झालेले नाही.गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये क्षय रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. त्याचबरोबर एमडीआर आणि एक्सडीआरचे रुग्णही मोठय़ा संख्येने आढळू लागले आहेत. क्षयरोग रुग्णालयात भरती, तपासणी, निदान, औषधोपचार आणि भरती केलेल्या क्षय रुग्णांना आहार विनामूल्य देण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने गुरुवारी आरोग्य समितीच्या बैठकीत दिली.क्षयाबाबत जनजागृती करण्यासाठी चित्रपट अभिनेता, बिग बी अमिताभ बच्चनला घेऊन पालिकेने ‘टीबी हटेगा, देश जितेगा’ अशी जाहिरातबाजी केली आहे. पत्रकांचे वितरण करण्यात येत आहे. पण आपल्याच रुग्णालयात दाखल झालेल्या क्षयग्रस्त रुग्णांना सकस आहार देताना मात्र पालिका आखडता हात घेत आहे, अशी टीका शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी या वेळी केली.