रेल्वेमंत्री महाराष्ट्राचे असूनसुद्धा राज्याच्यादृष्टीने कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा न झाल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली. 
सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच रेल्वे अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे समस्यांना घेऊन महिनाभर आधीच सुरेश प्रभूंची भेट घेतली होती. परंतु, प्रत्यक्षात रेल्वेमंत्र्यांनी उपनगरीय रेल्वेसाठी कोणतीही घोषणा केलेली नसल्याने या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासह मुंबईला काहीच मिळालेले नाही, अशी प्रतिक्रिया गजानन किर्तीकर यांनी दिली. तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी काहीही योजना रेल्वेअर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच न दिलेल्या रेल्वेमंत्र्यांच्या अर्थसंकल्पाने भ्रमनिरास झाल्याचे सांगत पूर्णपणे नाराज असल्याचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अाढळराव पाटील म्हणाले.