अंध-अपंगानी आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असतांना दुसरीकडे त्याच अनुषंगाने नॅब इंडिया व नॅब महाराष्ट्र यांच्यातर्फे ‘स्वयंरोजगार’ ही अनोखी योजना ऑगस्ट महिन्यापासून सुरू होत आहे. यासाठी पहिल्या टप्पात राज्यातील २०० युवकांची निवड करण्यात आली असून या माध्यमातून दृष्टिबाधित रोजगाराची पारंपरिक वाट सोडत नव्या संधीचा शोध घेणार आहेत. शासकीय निकषानुसार दृष्टिबाधित तसेच अपंग व्यक्तींनी आत्मनिर्भर व्हावे, आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावे यासाठी शासकीय तसेच निमशासकीय नोकरीत शारीरिकदृष्टय़ा व्यंग असणाऱ्यांसाठी तीन टक्के आरक्षण आहे. परंतु, बहुतांश दृष्टिबाधित तसेच अपंग व्यक्ती या साक्षर किंवा नोकरीसाठी अपेक्षित शैक्षणिक अर्हता प्राप्त करणाऱ्या नसल्याने त्यांच्यासाठी आरक्षित जागा या रिक्त राहतात. त्याचा विचार करत नॅब इंडिया व नॅब महाराष्ट्राने ‘स्वयंरोजगार’ या प्रकल्पाची आखणी केली आहे. यासाठी शैक्षणिक अर्हतेपेक्षा संबंधितांमधील उद्योजकीय कौशल्याला प्राधान्य देण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील १८ जिल्हांमध्ये याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात दृष्टिबाधित तसेच दिव्यांग व्यक्ती कोणत्या प्रकारचा व्यवसाय करू शकतील, त्यासाठी त्यांच्या आर्थिक व भौतीक गरजांचा विचार करण्यात आला. उद्योग सुरू करताना आर्थिक रक्कम देण्यात येणार नाही. मात्र उद्योगासाठी आवश्यक सामग्री व वस्तु उपलब्ध केल्या जातील. या तत्वावर २०० लाभार्थीची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आलेल्या प्रस्तावावर सध्या काम सुरू आहे. स्वयंरोजगार किंवा लघु उद्योग उभारणीसाठी ८० लाखाहून अधिक रक्कम अपेक्षित असून लाभार्थीने किमान २० टक्के रक्कम जमा करायची आहे. नॅब इंडिया लाभार्थ्यांना पाच हजारापासून एक लाख रुपयांपर्यंत मदत करणार असल्याची माहिती नॅब इंडियाचे मानद सचिव रॅपोज यांनी दिली. लाभार्थ्यांकडून आलेल्या प्रस्तावाची सध्या छाननी केली जात आहे. आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी काहींनी झेरॉक्स मशीन, शैक्षणिक साहित्य, शेतीसाठी उपयुक्त अवजारे, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, म्हैस पालन यासह अन्य काही लघु उद्योगासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीची मागणी केली आहे. सध्या प्रस्तावात संबंधित लाभार्थ्यांकडे असणारे भांडवल, त्याच्याकडे असणारी साधन सामग्रीची भौतीक उपलब्धता, त्याचे कौशल्य यांचा विचार केला जात आहे. त्यानुसार त्याने मागणी केलेली साधने त्याला दिली जातील. दुसरीकडे, नॅब इंडियाने संबंधितांकडून उद्योग सुरू राहील, असे हमीपत्र भरून घेण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योग सुरू केल्यानंतर पाठपुरावा सुरू राहणार आहे. या कालावधीत व्यवसाय बंद पडला तर ते साहित्य नॅब इंडिया जमा करून दुसऱ्या लाभार्थीला देईल असे या योजनेचे स्वरूप आहे. राज्यातून योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ऑगस्ट महिन्यात नॅबच्या विभागीय कार्यालयात योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल. यासाठी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार प्रयत्नशील आहेत.