बेकायदा बांधकामांच्या पाश्र्वभूमीमुळे गवते कुटुंबीयांचा पक्षप्रवेश लांबणीवर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली असतानाच बेकायदा बांधकामांमुळे अडचणीत आलेले दिघा येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते, त्यांची पत्नी अपर्णा गवते आणि भावजय दीपा गवते यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या तीन नगरसेवकांना जाहीर पक्षप्रवेश दिल्यास शिवसेना बेकायदा बांधकाम करणाऱ्या नगरसेवकांना पाठीशी घालत असल्याचा संदेश जाईल या भीतीने शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी या तीन नगरसेवकांना थांबा आणि वाट पाहा, असे सांगितले आहे, मात्र निवडणुका होताच हा प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडण्यास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. तुर्भे, वाशी, नेरुळ येथील प्रत्येकी एक नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण ५२ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे अपक्ष पुरस्कृत सुधाकर सोनावणे महापौर आहेत. यात दिघा बेकायदा इमारत प्रकरणात अडकलेल्या गवते कुटुंबाचे त्या भागात मोठे प्रस्थ आहे. या भागातील सर्व जमीन गवते कुटुंबाची असल्याने अल्प उत्पन्न गटातील अनेक रहिवाशांच्या वसाहती त्यांच्या जमिनीवर आहे. त्यामुळे या कुटुंबाचा या भागावर प्रभाव आहे. जगदीश गवते हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यांचे चुलत बंधू नवीन गवते हे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या तंबूत होते. गवते यांना बेकायदा बांधकाम प्रकरणात नाईक कुटुंबाने मदत न केल्याची भावना असल्याने गेले अनेक महिने ते शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. या गवते कुटुंबाने मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेऊन सर्वसामान्यांची घरे वाचावीत यासाठी प्रयत्न केले होते. त्या गवते यांनी सोमवारी मातोश्री गाठली खरी; पण मुंबई, ठाणे पालिकेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर त्यांना तूर्त प्रवेश नाकारण्यात आल्याचे समजते. हा प्रवेश औपचारिकरीत्या झाला नसला तरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात हे कुटुंब असल्याने निवडणुकांनंतर हा प्रवेश निश्चित मानला जात आहे. ठाणे पालिका निवडणुकीत हे तीन नगरसेवक शिवसेनेचे काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे केवळ पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावासाठी एकत्र आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी युतीमध्ये नगरसेवक पळवापळवी निश्चित असून राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईत महापौर निवडणूक सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता असून शिवसेनेला महापौरपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. पालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संख्याबळ ४६ पर्यंत असल्याने राष्ट्रवादीची नगरसेवक संख्या कमी करून आपले संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न शिवसेनेने गवते यांना घेऊन सुरू केला आहे. अपक्षांच्या सहकार्याने पालिकेचा सत्तासोपान खेचून आणण्याचा चंग शिवसेनेने बांधला असून गवते यांच्या प्रवेशाने त्या हालचालींना सुरुवात झाली आहे. आणखी काही जण पक्षांतराच्या तयारीत यानंतर वाशी व तुर्भे येथील एक महिला नगरसेविका तसेच नेरुळ येथील एक नगरसेवक शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय तुर्भे येथील क्षेपणभूमीमुळे नाराज असलेल्या तीन नगरसेवकांनाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे.