पावणा ठाणे-बेलापूर मार्गाला लागून असलेले एकमेव गाव म्हणजे पावणेगाव. पूर्व बाजूस डोंगर पश्चिम बाजूस मिठागरे व खाडी उत्तर-दक्षिण व उत्तर बाजूस घनदाट जंगल अशी भौगोलिक रचना असलेल्या या गावाचा आता चेहरा बदलून गेला आहे. चारही बाजूंनी औद्योगिक वसाहत आणि मधोमध असणारे हे पावणा गाव. शेतीवर पूर्णपणे अवलंबून असल्याने उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगार हीच या गावाची ओळख निर्माण झाली. गाावातील ग्रामस्थांनी जंगलातील रानमेवा, गवत, लाकूडफाटा, भात ठाणे-बेलापूर बाजारपेठेत विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. शहरातील सर्व गावांच्या जमिनी या सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित झालेल्या मात्र पावणे गावाच्या जमिनी या एमआयडीसीसाठीच्या औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे इतर गावांना मिळालेला जमीन मोबदला या गावाच्या वाटय़ाला आला नाही. या गावाच्या पूर्वेला पांडवकालीन असलेले पावणेश्वर मंदिरामुळे पंचक्रोशीत या गावाची आजही एक वेगळी ओळख आहे. या मंदिरामुळेच या गावाला पावणा असे नाव पडल्याचे काही ग्रामस्थ सांगतात तर अडीचशे वर्षांपूर्वी इतर गावांतून राहण्यास आलेल्या काही ग्रामस्थांच्या पाहुणचारामुळे या गावाला पावणा म्हटले जाते, असाही एक मतप्रवाह आहे. नामकरणाचे काही ठोस दस्तावेज नाहीत. तुर्भे रेल्वे स्थानकापासून तीन तर कोपरखैरणे रेल्वे स्थानकापासून अडीच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या पावणे गावाला आजही सर्ल इंडिया, इंडोफार्मा, स्टार केमिकल्स, हायको, सविता केमिकल्स, कृष्णा स्टिल, बी. आर. स्टील यासारख्या रासायनिक कारखान्यांनी वेढले आहे. काही वर्षांपूर्वी यातील अनेक कारखान्यांनी हवेत सोडलेल्या रासायनिक वायूमुळे अनेक ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने अख्ख्या गावाला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्या वेळी हे गाव खऱ्या अर्थाने चर्चेत आले होते. पूर्वेला पारसिक डोंगराच्या खाली दहा ते बारा कुटुंबांचा गावविस्तार झाला आहे. चारही बाजूंनी उद्योग-व्यवसाय असल्याने पोटापाण्यासाठी या गावाच्या आसऱ्याला आलेले हजारो परप्रांतीय राहत आहेत. याच गावाच्या पूर्वे बाजूस शेकडो वर्षांपूर्वी खोदकाम करताना श्री शंकराची स्वयंभू मूर्ती सापडल्याने बेलापूर पट्टीतील नऊ गावांनी एकत्र येऊन येथे श्री शंकराचे भव्य मंदिर बांधले आहे. आजही महाशिवरात्रीला संपूर्ण बेलापूर पट्टीतील ग्रामस्थ या पावणेश्वराच्या दर्शनासाठी आर्वजून हजेरी लावतात. गावासाठी हा एक आनंदाचा उत्सव मानला जातो. या निमित्ताने गावाचे पाहुणे गावात येतात. पांडवांनी पूजेसाठी तयार केलेली श्री शंकराची मूर्ती काही वर्षांपूर्वी आढळून आल्याने तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ब्रिटिशकाळात एका साधूपुरुषाने सांगितल्यावरून या जागेचे खोदकाम करण्यात आले होते. याच मंदिराच्या समोर असलेल्या डोंगरात एका विशाल दगडावर पांडवांपैकी भीमाचे पाय उमटले असल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी काही काळ वास्तव्य केल्यानंतर पांडव शिळफाटामार्गे अंबरनाथकडे गेल्याच्या कथा सांगितल्या जातात. त्यालाही तसा पौराणिक आधार नाही; पण ग्रामस्थ पांडवकालीन मंदिराचा इतिहास पटवून देण्याचा प्रयत्न करतात. चारही बाजूंनी उद्योग-वसाहत उभी राहिल्याने केवळ भातशेती, लाकूड, रानमेवा, मीठ आणि विशेषत: गवतविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ग्रामस्थांना या कारखान्यात नोकऱ्या लागल्या पण तेथील पगार अंत्यत तुटपुंजा असल्याने जगण्यासाठी संघर्ष करण्याशिवाय येथील ग्रामस्थांना दुसरा पर्याय नव्हता. ठाणे-बेलापूर पट्टीतील बहुतांशी गावांना सिडकोच्या साडेबारा टक्क्यांतर्गत विकसित भूखंड मिळाल्याने त्याच्या विक्रीतून चार पैसे लवकर हातात पडले. याउलट पावणे गावातील ग्रामस्थांची जमीन एमआयडीसी प्रकल्पासाठी संपादित झाल्याने केवळ पाच हजार रुपये एकरावर सरकारने बोळवण केली. त्यामुळे जोडव्यवसाय करीतच गावातील ग्रासस्थांनी आपला विकास केला आहे. जास्त पैसा हातात न खुळखळल्याने भौतिक सुखांवर उधळपट्टी करण्याची प्रवृत्ती गावात कधी दिसून आली नाही. त्यामुळेच नाना सुतार हा तरुण आजूबाजूच्या पंचक्रोशीतील पहिला पदवीधर या गावाने दिला. त्यानंतर ते सरपंच झाले. त्या अगोदर खैरणे ग्रुप ग्रामपंचायतीची मक्तेदारी मोडीत काढून रामदास पाटील यांनी पावणे गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा दिला. याच गावाची स्नुषा मनीषा भोईर नंतर या २१ व्या शतकातील शहराच्या महापौर झाल्या. त्यामुळे गावाला थोडीफार राजकीय पाश्र्वभूमी निर्माण झाली आहे. शिक्षणात सध्या चार जण इंजिनीअर झाले आहेत. गावातील प्राथमिक शाळेला यंदा ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन माध्यमिक शाळादेखील सुरू व्हावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या महाशिवरात्रीबरोबरच गुढीपाडव्यानंतर होणारी गावातील जत्रा गावातील एकोपा अबाधित ठेवण्यास उपयुक्त ठरते. कोकणातील होळी सणाची रीत परंपरा या गावातही असून आजही गावात एकाच ठिकाणी होळी उत्सव साजरा केला जातो हे विशेष. भांडण-तंटा टोकापर्यंत न नेणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी शाळा, रस्ते, विहिरी, मंदिरांचा जीर्णोद्धार हा श्रमदानाने केला आहे. गावात १९८६ रोजी महिलांना प्रियदर्शिनी महिला मंडळ स्थापन केले. याच मंडळाच्या अनुषंगाने प्रौढ शिक्षण, मंदिर डागडुजी, भजन असे उपक्रम आजही सुरू ठेवले गेले आहेत. १९६६ मध्ये गावात पाणी आणि वीज आल्यानंतर विकासाचे पर्व सुरू झाले मात्र आजूबाजूचे औद्योगिकीकरण व नागरीकरणाने गावाला वेढले आहे.