रानसई धरणावर सुरक्षारक्षकांना न जुमानता पर्यटकांनी हुल्लडबाजी केल्याची घटना घडली. परवानगी नसताना धरणाच्या बांधावर जाण्याचा काहींनी प्रयत्न केला. यासाठी बंदोबस्त मिळावा याकरिता पोलिसांना पत्र दिल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. धरणानजीक आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना पोलिसांशी कायदेशीर मान्यता आहे; परंतु त्याआधी काही दिवस पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. यासाठी अर्जाचीही तरतूद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणावरून रायगड जिल्ह्य़ातील अनेक धबधब्यांखाली जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी पर्यटकांनी रानसईकडे धाव घेतली होती. या वेळी काहींनी या ठिकाणी गटारीही साजरी केल्याचे समजते. धरणाचा बांध असलेल्या ठिकाणी पर्यटकांनी प्रवेश करू नये, असे जागोजागी फलक लावूनही अनेकांनी थेट बांधावर प्रवेश केला. काहींनी तर धरणाच्या काठावर जाऊन धरणात उडय़ाही घेतल्या. यातील दोघांनी एमआयडीसी कर्मचाऱ्यांचा विरोध न जुमानता कठडय़ावर मासेमारीचा प्रयत्न केला. धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून एमआयडीसीने कडक सुरक्षेची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यावर धरणानजीक पोलीस बंदोबस्त ठेवला जात असल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली. पर्यटक सुरक्षारक्षकांना दमदाटी करतात. या संदर्भात दखल घेऊन उपाययोजना करण्यासाठी उरण पोलीस आणि तहसीलदारांना पत्र दिले आहे. - किरण भाटे, एमआयडीसी उपअभियंता