पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे मत; आवश्यक माहिती न देणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा ‘प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून फुटण्यापासून ते निकालातील चुका टाळण्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाबरोबरच महाविद्यालयांनीही शिस्त पाळणे आवश्यक आहे. पुढील परीक्षेपासून महाविद्यालयांना पुरेशी मुदत दिल्यानंतरही निकाल, आवश्यक माहिती न देणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिला आहे. पुढील परीक्षेपासून ‘नीट’प्रमाणेच विद्यापीठाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही कडक नियम करण्यात येतील, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला डॉ. करमळकर यांनी भेट देऊन विद्यापीठाचे कामकाज, प्रशासन, संशोधन, उच्च शिक्षणाची दिशा आणि सर्व अनुषंगाने असलेली आव्हाने यांबाबत संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक तक्रारी असलेल्या परीक्षा विभागाबाबत ते म्हणाले, ‘परीक्षेचे कामकाज अधिक सुरळीत व्हावे. यासाठी महाविद्यालयांसाठीही खूप चांगली पद्धत आखण्यात आली आहे. मात्र प्रश्न त्याच्या अंमलबजावणीमध्ये आहे. महाविद्यालयांनीही शिस्त बाळगल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील. प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षेतील गैरप्रकार यांच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठीचे नियमही कडक करण्यात येतील. ‘नीट’प्रमाणेच परीक्षेपूर्वी अर्धा तास केंद्रावर येणे, मोबाइल आणि उपकरणे आणण्यासाठी बंदी असे काही नियम पुढील वर्षांच्या परीक्षेपासून लागू करण्याचे विचाराधीन आहे.’ शिक्षणाचा दर्जा, कौशल्य विकासाची गरज यांबाबत बोलताना डॉ. करमळकर म्हणाले, ‘नोकरी मिळण्यासाठी योग्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे आणि विविध क्षेत्रांना क्षमता असणारे मनुष्यबळ मिळणे हेच उच्चशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने अभ्यासक्रमांत कागदोपत्री किंवा वरवरचे बदल करून उपयोगी नाही. . भारतातील सर्वच विद्यापीठांमधून संशोधन होत नसल्याची टीका असते. त्यात काही अंशी तथ्यही आहे. शेकडोनी संशोधन निबंध प्रसिद्ध होत असतात मात्र त्याच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न आहे. विद्यापीठामध्ये एकाच प्रकारचे शिक्षण आणि काम करणारे अनेक विभाग आहेत. त्यांनी एकत्र काम केले तर संशोधनाचा दर्जाही सुधारेल आणि आर्थिक स्रोतांचाही चांगला वापर करणे शक्य होईल.’ ‘तातडीने नवे वसतिगृह बांधणे हे अशक्य आहे, ते एका रात्रीत होणार नाही. मात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहे चांगली मिळावीत यासाठी आहे त्या इमारतींमध्ये अधिकाधिक सुधारणा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,’ असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले ‘सॅटेलाइट कॅम्पससाठी महाविद्यालयांची मदत घेणार’ विद्यापीठाचा वाढता पसारा लक्षात घेऊन ‘सॅटेलाइट कॅम्पस’ची योजना आखण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेली काही छोटी महाविद्यालये आहेत, त्यांचे परिसर त्यासाठी वापरता येतील. त्या दृष्टीने महाविद्यालयांशी बोलणे सुरू आहे. त्यांच्याच परिसरात विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करता येईल का, या दृष्टीनेही विचार करण्यात येत आहे,’ असे डॉ. करमळकर यांनी सांगितले. बहि:स्थ तातडीने बंद होणार नाही ‘बहि:स्थ अभ्यासक्रमाला सध्या परवानगी नाही हे सत्य असले, तरीही हे अभ्यासक्रम चालवणे ही अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम बंद करता येणार नाहीत. दूरशिक्षण अभ्यासक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांसाठी अभ्याससाहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र त्या दृष्टीने आतापर्यंत फारसे काम झाले नाही, आता तातडीने हे अभ्याससाहित्य तयार करता येणार नाही. त्यामुळे यंदा तरी विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आहे त्या परिस्थितीत बहि:स्थ अभ्यासक्रम चालवणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांचे वाढवलेले शुल्कही कमी करण्यात आले आहे,’ असे डॉ. करमळकर म्हणाले.