भाजप-शिवसेनेची तुटलेली युती, राष्ट्रवादीची न थांबलेली गळती, शिवसेनेतील अंतर्गत धुसफुस, वाढलेल्या गर्दीमुळे भाजपमध्ये निर्माण झालेले गोंधळाचे वातावरण, दोन्ही काँग्रेसच्या आघाडीतील बिघाडी, मनसे, एमआयएम, रिपाइं असे सारेच निवडणुकांच्या आखाडय़ात शड्डू ठोकून उतरले आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारीचे घोळ सुरू असल्याने अद्याप उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. फाजील आत्मविश्वास असल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये ‘स्व’बळाची खुमखुमी आहे. ‘मतदार राजा’ हुशार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत राजकीय पक्ष न पाहता उमेदवाराची कुंडली पाहूनच कौल दिल्याचा पूर्वीचा इतिहास आहे. त्यामुळे कोणाची लॉटरी लागेल, याची खात्री नाही. एखाद्याच पक्षाची निर्विवाद सत्ता येईल की त्रिशंकू अवस्थेला सामोरे जावे लागेल, असेही सांगता येणार नाही.

भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या संभाव्य युतीचा काडीमोड झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाल्याने त्यांचा सूर जुळणे अवघड आहे. प्रत्येकाला ‘स्वबळ’ अजमावून घेण्याची खुमखुमी असल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे पिंपरी पालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, एमआयएम असे पक्ष स्वतंत्रपणे उतरणार आहेत. भाजप-रिपाइं (आठवले गट) यांच्यात युती होणार असली तरी त्यांच्यात जागावाटप व चिन्हाच्या मुद्दय़ावरून बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. राष्ट्रवादीला सत्ता टिकवायची आहे. भाजप-शिवसेनेला ती खेचून आणायची आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करायचे आहे. मनसेचा लढा अस्तित्वासाठी आहे. ‘एमआयएम’ला खाते उघडायचे आहे. जेमतेम तीन आठवडय़ांचा कालावधी आहे, त्यानंतर प्रत्येकाची ‘औकात’ स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीची गेल्या १५ वर्षांपासून पिंपरी पालिकेत सत्ता आहे. त्यातील १० वर्षे राष्ट्रवादीने स्वबळावर निर्विवाद बहुमत मिळवले होते. ‘कारभारी’ अजित पवार यांचा झंझावात आणि ताकदीच्या स्थानिक नेत्यांचे एकत्रित बळ राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडत होते. गेल्या दोन वर्षांत विशेषत: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीतील परिस्थिती पूर्णपणे बदलली. राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार राहुल नार्वेकर (मावळ) आणि देवदत्त निकम (शिरूर) यांची दाणादाण उडाली. विधानसभा निवडणुकीत विलास लांडे (भोसरी), अण्णा बनसोडे (पिंपरी), नाना काटे (चिंचवड) हे राष्ट्रवादीचे तीनही उमेदवार पराभूत झाले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार महेश ‘दादा’ लांडगे, माजी महापौर आझम ‘भाई’ पानसरे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. या सर्वाच्या समर्थकांचा आजी-माजी नगरसेवकांचा मोठा फौजफाटा भाजपमध्ये दाखल झाल्याने खिंडार पडलेली राष्ट्रवादी दुबळी दिसू लागली. त्यातून सावरण्याचा आटोकाट प्रयत्न पवार ‘दादा’ करत असले, तरी रोज एक नवीन दुखणे त्यांच्यासमोर येत आहे. राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असलेल्या बऱ्याच पानसरे समर्थकांना थोपवणे अजित पवारांच्या दृष्टीने जिकिरीचे बनले आहे. माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी पक्ष सोडण्याचा ‘सुका डोस’ दिल्याने ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’, अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे. प्रतिकूल परिस्थितीत गळती रोखण्याचे, सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीसमोर असताना, प्रतिस्पर्धी भाजप-शिवसेनेची संभाव्य युती तुटली, हे अजित पवारांच्या दृष्टीने ‘सुंठीवाचून खोकला’ गेल्यासारखे झाले. युती झाली असती तर राष्ट्रवादीला प्रत्येक प्रभागात युतीशी कडवी लढत द्यावी लागली असती, त्यातून एकेक जागा कमवत सत्तेचे गणित जुळवणे अवघड होऊन बसले असते. आता तसे होणार नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून युती तोडल्याची घोषणा केली, ती पवारांच्या पथ्यावर पडली आहे. पिंपरीत शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला असला तरी खरा आनंदोत्सव राष्ट्रवादीच्या गोटात आहे. एकतर, राष्ट्रवादीचे लढतीचे आव्हानच सोपे झाले आणि युती तुटल्यापासून भाजप-शिवसेनेने राष्ट्रवादीला सोडून एकमेकांकडेच आपल्या तोफा वळवल्या आहेत. मुंबई असो की पfxपरी-चिंचवड, खरा शत्रुपक्ष सोडून भाजप-शिवसेनेतच कलगीतुरा रंगणार आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या नावाने गळा काढणारे, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारावर तुटून पडणारे भाजप-शिवसेनेचे नेते प्रत्यक्षात राष्ट्रवादीचा फायदा होईल, अशाच उलाढाली करताना दिसणार आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत ‘छुपी युती’ होण्याची लक्षणे आतापासूनच दिसू लागली आहे. मुळातच शिवसेनेचा एक गट राष्ट्रवादीची ‘बी टीम’ म्हणूनच काम करतो, त्यांचे आता चांगले फावणार आहे. भाजपला एकटे पाडण्यासाठी किंवा ठाकरे यांच्या भाषेत भाजपचा उधळलेला बैल रोखण्यासाठी शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीचाच आधार घेतील, असे दिसते. अनेक प्रभागांत भाजपच्या पराभवाचे कारण शिवसेना ठरणार असून, त्याचा फायदा थेट राष्ट्रवादीला होणार आहे. सत्तेची चादर अंगावर घेणाऱ्यांची रांग लागल्याने भाजपमध्ये फाजील आत्मविश्वास आहे. त्यामुळेच ते कोणालाही जुमानत नाहीत. भाजपची राष्ट्रवादी झाली. वाढलेल्या गर्दीने भाजपमध्ये ‘गोंधळात गोंधळ’ सुरू आहे. जुन्यांना वाली राहिला नाही, अशी ओरड करत पक्षाला वेठीस धरून अनेकांनी ‘दलाली’चे काम केले. भाजपमध्येही अशाच काहींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संगनमत करून कमकुवत उमेदवार देत राष्ट्रवादीचा रस्ता सुलभ करण्याचा घाट घातला जात आहे. राष्ट्रवादीने पर्यायाने अजित पवारांनी िपपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस संपवली, अशी सल काँग्रेसमध्ये आहे. अशा राष्ट्रवादीशी वाटाघाटी करण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध आहे. काँग्रेस रसातळाला गेल्यामुळेच राष्ट्रवादीचा जनाधार वाढला. काँग्रेसचे झाडून नेते राष्ट्रवादीत गेले. काँग्रेसचा हक्काचा असणारा मतदार राष्ट्रवादीने स्वत:कडे वळवला. त्यामुळे पक्षाघात झाल्याप्रमाणे काँग्रेसची सध्याची अवस्था आहे. तरीही आघाडीसाठी दोन्ही काँग्रेसचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. राष्ट्रवादीने वेळकाढूपणा चालवला आहे. आघाडी झाली तरी फायदा एकटय़ा राष्ट्रवादीचाच आहे. थोडय़ाफार मताने पराभूत होऊ शकणारे राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीमुळे तरून जातील. मात्र, काँग्रेसला राष्ट्रवादीचा फारसा उपयोग होईल, असे दुरान्वये वाटत नाही. मुळातच, भल्या मोठय़ा प्रभागांमुळे राजकीय पक्षांची व त्यांच्या उमेदवारांची प्रचंड दमछाक होणार आहे. अपक्षांचा किंवा बंडखोरांचा तर निभावही लागणार नाही. ३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. जेमतेम तीन आठवडय़ांचा कालावधी मिळणार असल्याने प्रत्येकाला वेळ कमी पडणार आहे. कसेही करून निवडून येण्याचा प्रयत्न उमेदवारांचा राहणार असून ‘मनी’, ‘मसल’ आणि ‘मॅन पॉवर’वाले बाजी मारतील, हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही.

अण्णा बनसोडे यांचे पक्षांतर ‘नाटय़’

राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे भाजपमध्ये जाणार, असे पिल्लू सोडण्यात आले. बनसोडे समर्थकांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्याचे वांदे झाले आहेत. नीलेश पांढारकर, सतीश काटे, नीता ढमाले अशा अनेक समर्थकांचा विचार होत नसल्याने बनसोडे यांनी पक्ष सोडून जाऊ, असे वातावरण तयार केले आहे. वास्तविक, बनसोडे यांना भाजपमध्ये बिलकूल भवितव्य नाही. भाजपची आधीच राष्ट्रवादी झाली म्हणून बोंब आहे. बनसोडे यांना पिंपरीतून पुन्हा आमदारकी लढायची आहे. भाजपमध्ये मुळातच बरेच दावेदार ठाण मांडून बसलेले आहेत. बनसोडे एकेकाळचे भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय होते. मधल्या काळातील घडामोडींमुळे जगताप-बनसोडे यांच्यात पूर्वीप्रमाणे सख्य राहिलेले नाही. बनसोडे यांचे राजकारणातील सुरुवातीचे गुरू व नंतरचे कट्टर हाडवैरी आझम पानसरे नुकतेच भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन बनसोडे यांच्या आमदारकीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. तूर्त, पक्षाचे नेते अजित पवारांनी दूरध्वनीवरून बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असल्याने पेल्यातील वादळ शांत होणार की खरेच बनसोडे पक्ष सोडणार, हे लवकरच स्पष्ट होईल.