tvlogदुर्घटना आणि अपघात कधी घडतील, याचा काहीही नेम नसतो. मात्र पावसाळ्यात आपत्तींची शक्यता दुणावते. अतिवृष्टीत धोकादायक इमारतींचा पाया अधिक भुसभुशीत होतो. प्लास्टिक टाकून तसेच टेकू लावून या इमारती पडू नयेत याची दक्षता घेतली जाते. मात्र तरीही एखादी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून अपघात होतात. सखल भागात पाणी साचून रहिवाशांचा संपर्क तुटतो. वादळामुळे विजेच्या तारा पडून शॉर्ट सर्किट होण्याची भीती असते. अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी ठिकठिकाणची स्थानिक प्रशासने सज्ज असतात. हल्ली या विभागाकडे अत्याधुनिक साधने आली आहेत. त्यामुळे दुर्दैवाने एखादी आपत्ती घडलीच, तर तातडीने मदतकार्य उपलब्ध करण्याचे काम हे विभाग करीत असतात. ठाणे परिसरात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागांचा हा वेध..   

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांतील धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले असून अशा घटनांचा सामना करण्यासाठी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग बारमाही आणि २४ तास सज्ज असतो. महापालिकेने आपत्ती विभागासाठी स्वतंत्र आणि अद्ययावत अशा सुसज्ज नियंत्रण कक्षाची निर्मिती केली असून या कक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक दूरध्वनीची खात्री करून आपत्तीच्या ठिकाणी मदत पोहोचविण्याचे काम करण्यात येते. या विभागामार्फत गेल्या काही वर्षांपासून आपत्ती निवारणाचे काम उत्कृष्टपणे सुरू असून त्याचा प्रत्यय ठाणेकरांना शीळ-डायघरच्या लकी कम्पाऊंड इमारत दुर्घटनेवेळी आला आहे.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच नियंत्रण कक्ष अहोरात्र सुरू नसल्यामुळे नागरिकांना तक्रारीची सोयही उपलब्ध नव्हती. मात्र, २६ जुलै २००५च्या अतिवृष्टीनंतर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबतच आपत्तीसंबंधी माहिती देण्यासाठी २४ तास हा विभाग सुरू ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, महापालिकेने २००९ पासून नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती विभाग रात्रंदिवस उपलब्ध करून दिला. तसेच या विभागाच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली. या विभागासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्यामध्ये दहा हॉटलाइन, दहा दूरध्वनी आणि दोन वायरलेस यंत्रणा आदींचा समावेश आहे. याशिवाय, एखादी आपत्ती ओढवल्यास त्याचा सामना करण्यासाठी हा विभाग २४ तास सज्ज असून या विभागाकडे त्यासाठी पुरेशी साधनसामग्रीही उपलब्ध आहे.
ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग अन्य आपत्ती विभागांशी जोडण्यात आला असून त्यामध्ये मंत्रालय आणि मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, ठाणे अग्निशमन विभाग आणि ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाचा समावेश आहे. या विभागांसोबत दर तासाने एखादी आपत्ती घटना घडली असेल तर त्या माहितीचे आदानप्रदान करण्यात येते. शीळ-डायघरच्या लकी कम्पाऊंड इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्याचे काम या विभागाने केले. याशिवाय, या विभागाकडून वृक्ष कोलमडल्याच्या घटनेचीही तातडीने दखल घेण्यात येते. तसेच या कक्षाचे दूरध्वनी नागरिकांना आपत्तीची माहिती देण्याकरिता चोवीस तास सुरू असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा कारभार नियोजनबद्धतेने सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे महापालिकेला पावसाळा आल्यावर आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे का, याची चाचपणी करावी लागत नसल्याचे चित्र आहे.

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

पूर परिस्थितीत काय कराल?
tv02पावसाळ्यात जोरदार पाऊस आल्यानंतर नदी-नाल्यांना पूर येतात. किनाऱ्यावर राहणाऱ्या कुटुंबांना अशावेळी विशेष काळजी घ्यावी लागते. माणसाचा जीव अत्यंत मौल्यवान असल्याने त्यांची सुरक्षितता आणि त्यानंतर संपत्तीचे रक्षण अशा दोन्ही पैलूंकडे लक्ष द्यावे लागते. त्याचबरोबर डोंगर उतारावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना भूस्खलनापासून सुरक्षित राहण्यासाठीदेखील विशेष काळजी घ्यावी लगते.

’ पूर परिस्थिती असताना उपलब्ध साधनसामग्रींचा वापर करून आपली मालमत्ता व जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा.
’ जर तुम्हाला पुरासंदर्भात पूर्वसूचना मिळाली असेल किंवा तुम्हाला पूर येईल अशी शंका येत असेल तर तुमच्या घरातील उपयुक्त सामान व महत्त्वाची कागदपत्रे इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवा.
’ घरात काही कीटकनाशके असतील तर ती पाण्यात मिसळणार नाहीत याची दक्षता घ्या, जेणेकरून पाणी प्रदूषित होणार नाही.
’ जर तुम्ही घर सोडणार असाल तर पाणी, वीज व गॅस कनेक्शन बंद करून जा.
’ घर सोडून जाताना घराची दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा.
’ पूर आलेल्या भागात विनाकारण भटकू नका. गर्दी करू नका.
’ प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
’ प्रवासात ओढे, नाले, नद्या आदींच्या पाण्याचा जोरदार प्रवाह असताना त्यातून वाहने नेण्याचा प्रयत्न करू नका. स्थानिक नागरिक अथवा प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका.

* पावसाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्याल?
’ पावसाळ्यात जास्त पर्जन्यवृष्टी झाल्यास डोंगर उतारावरील मुरूम व मातीच्या सच्छिद्र भूपृष्ठाला तसेच पठारावर असलेल्या खडकांना तडे जातात आणि तडे गेलेला भाग हळूहळू खचू लागतो आणि दरड कोसळण्याचे प्रकार घडतात.
’ भूभाग खचल्याने भिंतींना भेगा पडतात आणि घरांची पडझड होते.
’ झाडे, विद्युत खांब कलतात, झऱ्यांची दिशा बदलते किंवा नवीन ठिकाणी झरे निर्माण होतात.
’ विहिरींच्या पातळीत अचानक वाढ किंवा घट होते.
’ या प्रकारचे बदल आढळल्यास तातडीने तात्पुरत्या निवारास्थळी स्थलांतरित व्हा. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे आपल्यासोबत ठेवा.
’ डोंगर उताराचा समतोल राखण्यासाठी नवीन घरांचा विस्तार वाढवू नका. डोंगर उतारावर धोकादायक भागात नवीन घरे बांधू नका.
’ उतारावर चर खणू नका अथवा जंगलतोड करू नका. डोंगर उताराचे सपाटीकरण करू नका.
’ अफवांवर विश्वास ठेवू नका.

*‘वीज’
’अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजांबरोबरच ‘वीज’ ही मानवाच्या आयुष्यातील प्रमुख गरज बनली आहे. अशा या अत्यावश्यक विजेचा वापर करत असताना सातत्याने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातला त्यात पावसाळा हा अत्यंत धोकादायक कालखंड. त्यामुळे पावसाळ्यामध्ये वीज ग्राहकांनी सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक आहे.

* न दिसणाऱ्या विजेपासून सावधान!
’ वीज दिसत नाही, पण तिचे परिणाम मात्र जीवघेणे असतात. विजेपासून प्रामुख्याने सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किट मुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. कारण पाणी हे विजेचे चांगले वाहक आहे. त्यामुळे पावसाळ्यात विजेपासून होणारे अपघात टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी.

* सतर्कता हीच सुरक्षितता!
’ पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळ्यात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषत: मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्विच बंद करावे व तात्काळ महावितरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधून मीटरची जागा बदलून घ्यावी.

* काय करू नये!
’विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. तसेच त्यावर कपडे वाळत टाकू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टिना वीजतारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणे दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पाण्यात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकडय़ा-तुकडय़ात जोडू नये, तसेच वायरची जोडणी इन्सुलेशन टेप लावून करावी.
संकलन : समीर पाटणकर

हेल्पलाइन क्रमांक : आपत्ती व्यवस्थापन कक्ष (टोल फ्री क्रमांक) : १८००-२२-२१०८ किंवा
दूरध्वनी क्रमांक : २५३७१०१०