भारतीय दूरसंचार क्षेत्रात पुनप्र्रवेश करण्याचे मुकेश अंबानी यांचे स्पप्न वर्षअखेर पूर्ण होऊ घातले आहे. बहुप्रतिक्षित असलेली रिलायन्स जिओची ४जी सेवा येत्या डिसेंबरपासून अवघ्या ४,००० रुपयांमध्ये उपलब्ध होत असल्याची त्यांनी शुक्रवारी घोषणा केली.
दशकभरापूर्वी ‘मान्सून हंगामा’ या ब्रीदासह या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या मुकेश अंबानी यांनी नव्या जोमाने होत असलेल्या पुनर्प्रवेशात, आपल्या सेवेसाठी मोबाइलधारकांना महिन्याकाठी देयक ३०० ते ५०० रुपयांचे असेल, असे वचन रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला जमलेल्या भागधारकांना दिले.
मुंबईतील या सभेत पत्नी व नवनियुक्त संचालिका नीता अंबानी व दोन्ही पुत्रांच्या उपस्थितीत मुकेश अंबानी यांनी केलेल्या तासाभराच्या संबोधनात, त्यांचा उद्योगसमूह आघाडीवर असलेल्या तेल व वायू क्षेत्रात येत्या दीड वर्षांत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
अतिवेगवान अशा ४जी दूरसंचार सेवेसाठीचे देशव्यापी परवाना मिळालेली रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही एकमेव कंपनी आहे. याबाबतच्या ध्वनिलहरी लिलावात यशस्वी ठरलेल्या कंपनीची सेवा गेल्या वर्षीच अस्तित्वात येणे अपेक्षित होते. सध्या या सेवेची अंतर्गत तपासणी सुरू असून आता ती डिसेंबर २०१५ अखेर अस्तित्वात येईल, असे स्पष्ट झाले आहे. दूरसंचार सेवेचे १०० टक्के जाळे येत्या तीन वर्षांत देशभरात पसरविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
संस्थापक स्व. धीरुभाई अंबानी यांना रस असलेल्या एकत्रित रिलायन्स समूहाने दशकभरापूर्वी दूरसंचार सेवा क्षेत्रात शिरकाव केला होता. अवघ्या ५०० रुपयांमध्ये सीडीएमए तंत्रज्ञानावर उपलब्ध मोबाइल सेवेवर त्या वेळी ग्राहकांच्या उडय़ा पडल्या होत्या. रिलायन्सच्या विभाजनात हा व्यवसाय अखेर धाकटे अनिल अंबानी यांच्याकडे गेला, जो रिलायन्स कम्युनिकेशन्स नावाने कार्यरत आहे.

संगणक, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणे वेगवान सेवा प्रत्येकाला पुरविण्याचा आमचा मानस आहे. ही सेवा अर्थातच शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येकाला मिळाली पाहिजे. अमेरिकेचा अध्यक्ष १० ते १५ वर्षांपूर्वी ज्या सेवा उपभोगत होता त्या सर्व येथे उपलब्ध झाल्या पाहिजे.
-मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज.

*भागधारकांचे स्वप्नरंजन
दोन लाख कोटींचे प्रकल्प दीड वर्षांत करणार
देशातील तेल व पेट्रोकेमिकल व्यवसायात आघाडीचा समूह असलेल्या रिलायन्सतर्फे या क्षेत्रातील विविध दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प येत्या वर्ष-दीड वर्षांत पूर्ण केले जातील, असेही वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने स्पष्ट करण्यात आले.

*पेट्रोल पंपांचे पुनरूज्जीवन
काही नव्या क्षेत्रांत उतरण्याचा मानसही मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने व्यक्त केला. सध्या बंद पडलेल्या पेट्रोल पंपांना पुनरुज्जीवित करण्याचा इरादाही व्यक्त करण्यात आला. रिलायन्सने २००७ सालात सुरू केलेले १,४०० पंपांचा अनुदान दरात इंधन विकणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांच्या पेट्रोल पंपांसमोर टिकाव लागला नाही. चालू आर्थिक वर्षांत ४०० पंप सुस्थितीत आणण्यासह येत्या वर्षभरात ९०० शहरांमध्ये पंप सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

*दूरचित्रवाणी : केबल टीव्हीसह दूरचित्रवाणी प्रक्षेपण व वितरण क्षेत्रातही कंपनी उतरणार आहे.

*सॉफ्टवेअर : कंपनी तिच्या मोबाइल ग्राहकांना वृत व मनोरंजन सेवेसाठी अनेक सॉफ्टवेअरही सुरू करणार आहे.

*बँकिंग : पेमेन्ट बँक परवान्यासाठी स्टेट बँकेच्या सहकार्याने अर्ज करण्याची मनीषाही अंबानी यांनी या वेळी व्यक्त केली.