महागडय़ा आणि आयात होणाऱ्या ‘ऑलिव्ह ऑइल’ला किफायती भारतीय पर्याय म्हणून पुढे आणल्या जात असलेल्या भाताच्या कोंडय़ाचे तेल अर्थात राइस ब्रॅन ऑइलचे आरोग्याच्या दृष्टीने अनेकानेक फायदे असले आणि भारतीय पाक-पद्धतीला ते अतिशय साजेसे असले तरी त्याच्या उत्पादनावर आजही अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत. संपूर्ण क्षमतेने उत्पादन घेतले तरी देशाच्या खाद्यतेलाची जेमतेम १०-१२ टक्केच मागणी हे तेल भागवू शकेल.
भात-कोंडय़ाच्या तेलालाच भारतात आदर्श खाद्यतेल म्हणून सार्वत्रिक स्वीकार केला जावा, यासाठी प्रबोधन व प्रसाराची मोहीम राबविणाऱ्या ‘सॉल्व्हन्ट्स एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए)’चे कार्यकारी संचालक डॉ. बी. व्ही. मेहता यांनी स्पष्ट केले की, भाताच्या उत्पादनात जगात चीननंतरचा दुसरा मोठा देश भारत जरी असला तरी सध्या देशात केवळ नऊ लाख टन इतकेच राइस ब्रॅन तेल उत्पादित होते. तर भारतातील वार्षिक खाद्यतेलाचा उपभोग हा १ कोटी १७ लाख टन असून, त्या तुलनेत उत्पादित राइस ब्रॅन तेलाचे प्रमाण जेमतेम ५ टक्के आहे. तथापि भारतात १५ लाख टन राइस ब्रॅन तेल बनविण्याची कमाल क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. या कमाल क्षमतेने जरी उत्पादन घ्यावयाचे झाले तरी एकूण मागणीच्या १२ टक्केच गरज भागविली जाऊ शकेल.
इंधन व सोन्यापाठोपाठ बहुमोल विदेशी चलन खर्ची घालून देशात आयात होणारा तिसरा मोठा घटक खाद्यतेलाचा आहे, याकडेही मेहता यांनी लक्ष वेधले. भारतात दरसाल १०० लाख टन इतके खाद्यतेल ५५,००० कोटी रुपये मूल्याच्या विदेशी चलनाच्या मोबदल्यात आयात होते. आयातपर्यायी उत्पादन म्हणून सरकारनेही भात-कोंडय़ापासून खाद्यतेल उत्पादनाला प्रोत्साहन द्यायला हवे, अशीही एसएईची मागणी आहे. सध्या देशात अदानी विल्मर, मॅरिको, राइसेला यासह विविध नऊ उत्पादकांचे राइस ब्रॅन तेलाचे ब्रॅण्ड्स बाजारात उपलब्ध आहेत. सध्या सर्वाधिक निरोगी तेल म्हणून ऑलिव्ह ऑइल लोकप्रिय आहे. परंतु भारतात तळलेल्या पदार्थाना सर्वाधिक पसंती दिली जाते आणि २१७ अंश सेल्सियस तापमानापर्यंत तापलेल्या राइस ब्रॅन तेलातही नैसर्गिक पोषणमूल्ये व अँटि-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अबाधित राहते. त्याउलट ऑलिव्ह ऑइल महागडे असण्याबरोबरच भारताच्या तळलेल्या पदार्थाकडे कल असलेल्या खाद्यसंस्कृतीला मानवणारे नाही, असा निर्वाळा प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. अंजली मुखर्जी यांनी दिला.