किमती वाढलेल्या आणि गृहकर्ज घेऊनही परवडणार नाही अशा ‘प्रीमियम’ घरांच्या निर्मितीवर विकसकांचा भर अशी स्थिती असलेली तरी मुंबई शहर ही सर्वाधिक मागणी असलेली देशातील अग्रेसर गृह बाजारपेठ हा आपला लौकिक आगामी काळातही कायम राखेल. किंबहुना, यंदा दिवाळीनंतर वेग पकडू पाहत शहरातील पुनर्विकसित इमारतींच्या अनेकानेक प्रकल्पांतून परवडणाऱ्या घरांचा नव्याने पुरवठा उपलब्ध होईल, असा कयास ‘डेस्टीमनी’ या गृहवित्त क्षेत्रातील सल्लागार संस्थेने व्यक्त केला.
गृहवित्त क्षेत्रात सात-आठ वर्षांपूर्वीइतका २५-३५ टक्क्यांचा वृद्धीदर नजीकच्या काळात दिसणे अपेक्षित नसले तरी १५ टक्के दराने प्रगती दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या खरेदी हंगामात दिसू शकेल, असे ‘डेस्टीमनी’चे क्षेत्रीय विक्री प्रमुख राजेश आर्या यांनी सांगितले. त्यांच्यामते, जुन्या इमारतींचे पुनर्वसन प्रकल्पांनी वेग पकडल्यास, ५० ते ७० लाख रुपये किमतीदरम्यानची घरे मुंबईत मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होतील आणि याच घरांना सध्या सर्वाधिक मागणी आहे.
‘डेस्टीमनी’ला चालू वर्षांत त्यांच्या व्यवसायात ५० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष २०१३ मध्ये कंपनीच्या सेवांच्या माध्यमातून ११०० कोटी रुपयांचे गृहवित्त वितरीत केले गेले, चालू आर्थिक वर्षांत हा आकडा १७५० कोटींवर जाईल, असा अंदाज आर्या यांनी व्यक्त केला. गेल्या तीन वर्षांपासून कार्यान्वित असलेल्या या कंपनीच्या माध्यमातून देशभरात ६५०० घर-इच्छुक ग्राहकांना विविध बँका व वित्तसंस्थांकडून सुमारे रु. ३६०० कोटी इतके गृहकर्ज मंजूर झाले. मुंबई-पुण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रात नागपूर, अहमदनगर अशा नव्या केंद्रांमध्ये डेस्टीमनी आपले कार्यालय थाटून सेवाविस्तार करणार आहे.