तृप्ती राणे  trupti_vrane@yahoo.com

सोने आणि काळे सोने म्हणजेच तेल-या दोन्ही वस्तूंचा आपल्या सर्वाच्या आर्थिक आयुष्यावर परिणाम होतो. गुंतवणूकदार म्हणूनसुद्धा आणि ग्राहक म्हणूनदेखील. ज्या वेळी सगळ्यांचे लक्ष शेअर बाजाराच्या पडझडीकडे होते तेव्हा खनिज तेल आणि सोन्यामध्ये काही वेगळेच चालू होते. आजच्या लेखामधून आपण या दोन्हींचा आढावा घेणार आहोत.

सर्वप्रथम आपण पिवळ्या सोन्याकडे वळू या. आपल्या पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये सोन्याला भरपूर महत्त्वाचे स्थान आहे. अडीनडीला सहजपणे मदतीला उपयोगी पडणार ते सोने! तेव्हा आर्थिक गुंतवणूक पर्यायांच्या आधी सोने हे प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये होते. साधारणपणे २००३ पासून सोन्याच्या किमती झपाटय़ाने वाढायला लागली जी २०१२/१३ पर्यंत चालली. त्यानंतर मात्र त्याची घोडदौड थांबली आणि किमती २०१५ सालापर्यंत खाली आल्या. तिथून मात्र पुन्हा एकदा सोन्याने हळूहळू वाढायला सुरुवात केली आणि गेल्या दोन वर्षांपासून भरपूर मजल मारली. परंतु एक गोष्ट इथे मुद्दाम सांगावीशी वाटते. मार्च महिन्यामध्ये ज्या प्रकारे जगभरातील शेअर बाजार पडले, तसेच सोनेसुद्धा पडले. परंतु पडझड १२ ते १३ टक्के इतकी होती. सोन्यामध्ये गुंतवणूक करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्या :

१. सोने आपण आयात करत असल्यामुळे जागतिक बाजारातील सोन्याचे भाव तपासणे गरजेचे आहे.

२. जेव्हा जागतिक अस्थिरतेचे वातावरण निर्माण व्हायची शक्यता जास्त होते तेव्हा मध्यवर्ती बँका सोने विकत घ्यायला सुरू करतात आणि त्यामुळे सोन्याचा भाव वर जातो.

३. महागाई वाढायला लागली की सोने वाढते.

४. सोन्याचे भाव डॉलरशी निगडित असल्यामुळे डॉलरच्या किमती वाढल्या की सोने खाली येते आणि डॉलर खाली आला की सोन्याची किंमत वाढते.

५. आपल्या देशामध्ये सोने लग्न समारंभाच्या काळामध्ये वाढते.

६. मुदत ठेवीवरचे व्याजदर कमी झाले की सोन्याचे भाव वाढतात. कारण गुंतवणूकदार बँकेत पैसे ठेवायच्या ऐवजी सोन्यामध्ये ठेवणे पसंत करतात.

तेव्हा आता करोना संकटामुळे सोन्याचे नक्की काय होईल याबद्दल कुतूहल निर्माण होणे साहजिकच आहे. खाली दिलेल्या जागतिक सोन्याच्या किमतीच्या आलेखामधून समजून घेण्याची गोष्ट अशी की मागे २००८ साली जागतिक आर्थिक संकटामध्ये सोने २५ टक्के इतके पडले. पण त्यानंतर ऑगस्ट २०११ पर्यंत ते वाढत गेले. परंतु नंतर सप्टेंबर २०१२ पासून खाली यायला सुरू झाले आणि डिसेंबर २०१५ पर्यंत ते खाली आले. पुढे सप्टेंबर २०१८ पासून सोन्याच्या किमती वर जायला लागल्या आणि आता पुन्हा २००८ सारखी परिस्थिती निर्माण होईल काय या भीतीने पुन्हा एकदा नवीन १० वर्षांतील उच्चांकाकडे झेप घ्यायला सुरुवात झाली आहे. त्यात जर डॉलर खाली आला तर हा भाव नक्कीच वर जाईल. फक्त एका गोष्टीची इथे काळजी घेण्याची गरज आहे आणि ती म्हणजे कोणत्या देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी किती सोनं कधी विकलं जाईल ही. या कारणाने सोन्याचे भाव अल्पकाळासाठी खाली येतील.

दुसऱ्या बाजूला आपल्या देशातील सोन्याच्या सरासरी वार्षिक किमतींचा आलेख हा काहीसा असा दिसतो.

आपल्याकडे सोन्याचे भाव २०१५ पासून वाढतानाच दिसतात. यामागचे कारण आहे डॉलरच्या तुलनेत घसरणारे रुपयाचे मूल्य. येत्या काळात जर डॉलर पडला तर या वाढणाऱ्या सोन्याच्या भावांमधून आपल्याला नुकसान होणार नाही. पण जर रुपया कमजोर पडला आणि जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढले तर मात्र आपल्या देशाला नुकसान होईल. तेव्हा जे कुणी गुंतवणूक म्हणून आता सोन्यामध्ये पैसे घालणार असतील त्यांना खूप जास्त लक्ष ठेवायला लागणार आहे.

काळे सोने

आता वळू या काळ्या सोन्याकडे! तेल-सगळ्या जगाचे इंधन आणि इंजिन. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर खाली येणाऱ्या तेलाच्या दराने खूप फायदा होतो. आपल्या देशासाठी लागणाऱ्या कच्च्या तेलातील ८२ टक्के गरज ही आयातीतून भागवली जाते. तेलाच्या प्रत्येक एक डॉलर घसरणीने आपल्या देशाला ३,००० कोटी रुपयाचा फायदा होतो. तेव्हा एकीकडे सरकारच्या मिळकतीमध्ये असणारी तूट दुसरीकडे कमी होणाऱ्या तेल बिलाने काही अंशी भरून निघेल. पण जर बाकी सगळे नीट राहिले तरच. आज करोनामुळे तेलाची गरज कमी झाली आहे. आणि गेल्या महिन्यापर्यंत उत्पादनात काहीही कपात न झाल्यामुळे जगात आज गरजेपेक्षा जास्त पुरवठा आहे. पण आताच झालेल्या तेल उत्पादकांमधील करारामुळे येत्या मे महिन्यापासून उत्पादनात १० टक्के कपात होणार आणि यापुढे दोन वर्ष हळूहळू ही कपात कमी केली जाईल. तेव्हा कमी झालेल्या किमती परत वाढतील. त्यात देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश मिळेल अशी आशा आहे. पण जितके दिवस तेलाचे भाव कमी, तितके दिवस आपल्या देशातील तेल कंपन्या तोटय़ात राहाणार.

पण मुळात या सगळ्या गोष्टींवर करोनाचा नक्की किती फायदा किंवा नुकसान होईल हे अजूनपर्यंत कळलेले नाही. आपल्या देशातील उद्योगांवर होणारा परिणाम हा मार्च २०२० पुरता मर्यादित न राहता, पुढे जून २०२० आणि काही उद्योगांमध्ये तर अजून पुढे राहील. टाळेबंदीमुळे फक्त मागणी कमी नाही झाली, तर खर्च तेवढेच राहून मिळकत मात्र कमी झाली आहे. जितके जास्त दिवस करोनाच्या संकटामुळे देश बंद राहील तितके जास्त दिवस मागणी पुढे ढकलली जाणार आणि सरकार व नागरिक दोघांनाही जास्त आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. आणि त्यातून बाहेर पडून गाडी रुळावर यायलासुद्धा जास्त वेळ जाईल.

गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा शेअर बाजार वाढायला लागला आहे. पण गुंतवणूकदारांनी इथे गाफिल राहता काम नये. येत्या ३/४ महिन्यांमध्ये जेव्हा कंपन्यांचे वार्षिक आणि पहिल्या तिमाहीचे निकाल येतील तेव्हा समजेल की कुठल्या उद्योगामध्ये किती मूल्य आहे. तेव्हा पुढे मार्केट खाली पडणार नाही याची कोणतीही शाश्वती आता देता येणार नाही! तेव्हा जागते रहो – ऑल इज नॉट वेल!

लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.