गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने नवनवे उच्चांक नोंदवणारा मुंबई शेअर बाजार अर्थात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजनं आता उलट्या दिशेने प्रवास सुरू केलाय की काय? असं चित्र निर्माण झालं आहे. बुधवारी २७० अंकांनी घसरलेला शेअर आज तब्बल ११५९ अंकांनी घसरला आहे. बाजार सुरू होताच ३०० अंकांनी घसरलेला सेन्सेक पुन्हा सावरू शकलाच नाही. बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्सची ११५९ अंकांनी घसरण होऊन तो शेवटी ६० हजारांच्या खाली स्थिरावला. शेवटी सेन्सेक्सचा आकडा ५९ हजार ९८५ अंक इतका खाली आला होता.

सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीनं देखील उलटा प्रवास केला. सेन्सेक्स जवळपास १.७ टक्क्यांनी खाली उतरल्यानंतर निफ्टीमध्ये देखील जवळपास १.७७ टक्क्यांची घट दिसून आली. निफ्टी जवळपास ३२२ अंकांनी खाली येऊन १७ हजार ८५७ अंकांवर स्थिरावला.

गुंतवणूकदारांचं ४.५ लाख कोटींचं नुकसान!

दरम्यान, शेअर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांचं तब्बल ४.५ लाख कोटींचं नुकसान झाल्याची माहिती रिलायन्स सेक्युरिटीजचे स्ट्रॅटेजी प्रमुख विनोद मोदी यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. हेवीवेट फायनान्स आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या घडामोडींमुळे देशांतर्गत इक्विटीची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारात दिसून आला, असं देखील ते म्हणाले.

आज आयटीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, अॅक्सिस बँक आणि टायटन यांचं आज सर्वाधिक नुकसान झालं अशून त्यांचे शेअर्स ५.५४ टक्क्यांनी खाली उतरले आहेत.