Pitru Paksha 2022: १० सप्टेंबर पासून पितृ पक्षाला आरंभ झाला आहे. या पंधरवड्यात पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून श्राद्ध, पिंडदान, तर्पण केले जाते. असं म्हणतात कि या दिवसांमध्ये पूर्वज भूतलावर येऊन आपल्यासोबत वेळ घालवतात, आपल्याला आशीर्वाद देतात. मात्र या विधी नियमांनुसार न केल्यास यामुळे पितृदोषाचा धोका उद्भवू शकतो. ज्या कुटुंबातील पूर्वजांचे मृत्यूपश्चात वर्ष श्राद्ध किंवा अंत्यसंस्कार विधिवत झाले नसतील किंवा त्यांच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या असतील तर त्या पूर्ण होईपर्यंत पितृदोषाचा प्रभाव राहतो. यासाठीच अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला म्हणजेच इंदिरा एकादशीला (Indira Ekadashi 2022) व्रत व पूजा केली जाते.

पौराणिक कथेनुसार, या दिवशी पवित्र राजा इंद्रसेनने पितृ लोकात आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी उपवास व पूजा केली होती. यामुळे त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाले. तेव्हापासून इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपास आणि पूजा करण्याची पद्धत आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे ते हे व्रत करण्यास प्राधान्य देताना दिसतात.

Pitru Paksh 2022: पूर्वज नाराज असतील तर कुटुंबात दिसतात ‘हे’ संकेत; पितृ दोष वेळीच ओळखा

कधी आहे इंदिरा एकादशी?

पंचांगानुसार, या वर्षी इंदिरा एकादशी २१ सप्टेंबर २०२२ ला असणार आहे.

एकादशी तिथी प्रारंभ: २० सप्टेंबर २०२२ रात्री ९ वाजून २५ मिनिट ते
एकादशी तिथी समाप्ती: २१ सप्टेंबर २०२२ रात्री ११ वाजून ३५ मिनिट

इंदिरा एकादशी व्रत नियम

  • इंदिरा एकादशीचे व्रत पितृ पक्षात येते आणि त्याचा उपवास विशेषतः एखाद्याच्या मृत पूर्वजांच्या उद्धारासाठी साजरा केला जातो.
  • विधीनुसार इंदिरा एकादशीचे व्रत हे दशमीच्या दहाव्या दिवसापासून सुरू होते.
  • इंदिरा एकादशीच्या व्रताच्या पहिल्या दहाव्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न ग्रहण करण्याची मान्यता आहे
  • एकादशीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर उपवास केला जातो.
  • भगवान शालिग्रामची पूजा केल्यानंतर व्रत करणारे अनेकजण दिवसभर फळांचा आहार घेऊन उपवास करतात.
  • द्वादशीच्या तिथीला दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना अन्न आणि दान देऊन उपवास सोडवा असं शास्त्रात म्हटलं आहे.

Pitru Paksha 2022: पितृ पक्षात कावळाच नव्हे तर ‘या’ रूपातही आशीर्वाद देतात पूर्वज; रिकाम्या हाती माघारी पाठवू नका

इंदिरा एकादशी पूजा विधी

इंदिरा एकादशीच्या दिवशी शालिग्राम देवताची पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी सर्वप्रथम गंगेच्या पाण्यात स्नान केल्यानंतर आसनस्थेवर भगवान शालिग्रामची स्थापना केली जाते. यानंतर त्यांना धूप, दीप, हळद, फळे आणि फुले अर्पण केले जाते. यानंतर इंदिरा एकादशी व्रताची कथा पाठ करतात. पूर्वजांच्या उद्धारासाठी या दिवशी पितृसूक्त, गरुन पुराण किंवा गीतेचा सातवा अध्याय पाठण केला जातो. सामान्यपणे पूजा समाप्त आरतीने होते. जर या दिवशी श्राद्ध करायचे असेल तर पितरांसाठी अन्न तयार करून ते घराच्या दक्षिण दिशेला ठेवावे. गायी, कावळे आणि कुत्र्यांनाही हे अन्न खायला द्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप:- सदर लेख हा माहितीपर आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)