Why Husband Wife Shouldn’t Eat Together: जग फार झपाट्यानं बदलत चाललंय, प्रगतीच्या वाटा अधिक विस्तारत जात आहेत. त्यात अलीकडे पाश्चिमात्य संस्कृती मनामनात रुजत चालली आहे. देशात विचारस्वातंत्र्याचे वारे इतके वाहत आहेत की, भारतीय विचार आणि संस्कृती भारतीयांच्या मनातून वाहून गेली की काय, असाही कधी कधी प्रश्न पडतो. शास्त्रानुसार, आधी एकत्र कुटुंब व्यवस्था होती, ती आता कुठेतरी हरवली आहे. नवरा-बायको आता एकाच ताटात सर्रासपणे जेवतात. परंतु, पती-पत्नीने नेहमी एकाच ताटात जेवण केल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान होते. पती-पत्नीने एकाच ताटात जेवू नये, असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. याच कारणामुळे वडीलधाऱ्या व्यक्ती अशा गोष्टींवर आक्षेप घेताना दिसतात. काय आहे यामागील नेमकं कारण? वाचा, माहिती सविस्तरपणे…

नवरा-बायकोचं अनोखं प्रेम

हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांना रूढी-परंपरा शिकवणारेही राहिलेले नाहीत. त्यात घरामध्ये पती-पत्नी दोघेच राहत असतील, तर भांडी कमी भरावीत किंवा वाढण्याचा कंटाळा येतो अशा कारणाने दोघेही एकाच ताटात जेवण करतात. एका दृष्टीने त्यामुळे दोघांतील प्रेम वाढते, असे म्हटले जाईल. मात्र, वास्तुशास्त्रात ही बाब चांगली मानली जात नाही. काय आहे कारण….

पितामह भीष्मांनी पांडवांना सांगितलं ‘हे’ रहस्य

महाभारतात राजेशाही, मालमत्ता, कौटुंबिक समस्या आदींशी संबंधित अगणित घटनांचा समावेश आहे. महान योद्धा व ज्ञानी भीष्म पितामह यांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणात बाणांच्या शय्येवर पडून पांडवांना काही शहाणपणाचे विचार सांगितले होते. या प्रवचनांमध्ये धर्म आणि अधर्म याविषयीच्या शिक्षणापासून ते यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्याच्या टिप्सही देण्यात आल्या होत्या.

पती-पत्नीनं एका ताटात का जेवू नये?

भीष्म पितामह म्हणाले होते की, प्रत्येक व्यक्तीची आपल्या कुटुंबाप्रति अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये असतात. ती सर्व कर्तव्ये त्याने पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याप्रति असलेली जबाबदारी त्याने पार पाडली पाहिजे. प्रत्येक नात्याला योग्य न्याय देणे गरजेचे असते. पण जरा नवरा-बायको एकाच ताटात जेवले, तर नवऱ्याचे बायकोवरचे प्रेम वाढते आणि घरातील इतरांकडे तो दुर्लक्ष करू लागतो. मग त्यामुळे घरात वाद होतात आणि घराची शांतता भंग होते. म्हणूनच नवरा-बायकोने एकत्र जेवण करू नये, असे शास्त्रात सांगितले गेले आहे.

संपूर्ण कुटुंबानं एकत्र बसून भोजन करावं

कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करावे, अशी भीष्म पितामहांची धारणा होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंबातील परस्परांवरील प्रेम वाढते. त्याशिवाय एकमेकांप्रति त्याग आणि समर्पणाची भावनाही प्रबळ होते. असे कुटुंब नेहमी आनंदी असते आणि खूप प्रगती करीत असते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आनंदाने भोजन करावे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)