आनंद हर्डीकर

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतचा आपापला अभ्यासच खरा, असा आग्रह अभ्यासक मांडतात आणि तोही अन्य माहिती महत्त्वाची न मानता.  यातून काय गोंधळ होतो, हे दर्शवून देणारा प्रतिक्रियावजा लेख..

pakistani singer shazia manzoor slaps sherry nanha in the live show after asking honeymoon
“थर्ड क्लास माणूस…” संतापलेल्या गायिकेने लाईव्ह शोमध्येच कॉमेडियनच्या वाजवली कानाखाली; पाहा video
job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

आशीष रे यांच्या ‘लेड टू रेस्ट’ या पुस्तकाचे रवि आमले यांनी लिहिलेले ‘वादावर पडदा!’ हे पुस्तक परीक्षण (?) गेल्या शनिवारी ‘बुकमार्क’ पानावर वाचले. वरवर पाहता तो लेख म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी ग्रंथाचे परीक्षण आहे, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र तो राष्ट्रीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या, संवेदनशील विषयावरील फसव्या पुस्तकावरचा तितकाच फसवा परिचयपर नव्हे, तर गौरवलेख आहे. नेताजींसंबंधीच्या माझ्या अलीकडच्या अभ्यासाला ‘सुभाष : एक खोज’ या राजेन्द्र मोहन भटनागर यांच्या पुस्तकाच्या ‘लोकसत्ता’तील प्रदीर्घ पुस्तक परिचयामुळे पुन्हा एकदा चालना मिळाली असल्यामुळे रवि आमले यांचा आणि पर्यायाने आशीष रे यांचाही प्रतिवाद करण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे.

आशीष रे यांनी १९९० च्या ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांना दोन पानी पत्र पाठवले होते आणि रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजींच्या आहेत, असे मान्य करायला त्यांच्या पत्नी एमिली शेंकेल तयार नाहीत, असे कळवले होते. या पत्राची व त्याला जोडलेल्या चार पानी टिपणाची माहिती आमले यांनी करून घेतलेली नाही आणि नेताजींच्या मृत्यूबद्दल संशोधन करण्यात ३० वर्षे खर्ची घालणाऱ्या रे यांनीदेखील आपल्या पुस्तकात कुठेही ‘त्या’ पत्राची वाच्यता केलेली नाही. नरसिंह रावांपासून नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा नावानिशीवार उल्लेख करणारे आणि त्या सर्वाशी या विषयासंदर्भात आपण सतत विचारविमर्श कसे करीत होतो किंवा त्यांच्या निर्णयांवर भाष्य तरी कसे करीत होतो, याची तपशीलात माहिती देणारे रे व्ही. पी. सिंगांबरोबरच्या या पत्रव्यवहाराबाबत मात्र मौन बाळगून आहेत, हे आमले यांच्या लक्षातच आले नसावे, असे दिसते.

बहुधा राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध असणाऱ्या या सहा पानी दस्ताऐवजाबद्दल आमले यांना माहितीच नसावी; तथापि त्यामुळे रे यांचा या गंभीर समस्येबाबतचा दुटप्पीपणा त्यांच्या लक्षातच आलेला नाही आणि ते या पुस्तकाला विश्वासार्हतेचे अंतिम प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले आहेत.

पूर्वग्रहविरहित मनाने या कूटप्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारा एक अभ्यासक या नात्याने मी मात्र ती सहा पानेही अभ्यासली आहेत आणि ‘लेड टू रेस्ट’ हे ताजे पुस्तकही वाचले आहे.  आमले यांना वस्तुस्थिती माहिती नाही, हा त्यांचा दोष मानता येणार नाही व त्यामुळे काही प्रमाणात तरी त्यांना सूट मिळू शकेल; पण आशीष रे यांचे काय?

त्या पत्रव्यवहाराबद्दल आपल्या पुस्तकात त्यांनी पाळलेले मौन निव्वळ ‘सोयीस्कर’ म्हणून सोडून देता येण्याजोगे नाही. ते आपमतलबी आहे; हेतुत: लपवाछपवी करणारे आहे.

रेंकोजी मंदिरातील एका कलशामध्ये ठेवलेल्या अस्थी नेताजींच्याच आहेत, असे शाहनवाझ खान यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्य चौकशी समितीतील दोन सदस्यांचे म्हणणे होते. इंदिरा गांधी यांनी नेमलेल्या एकसदस्य चौकशी आयोगानेही तोच निष्कर्ष उचलून धरला होता; तथापि त्यानंतरच्या सुमारे १५ वर्षांत अशा काही गोष्टी पुढे आल्या की, पुन्हा एकदा सरकारतर्फे चौकशी आयोग नेमला जाईल, असे वाटू लागले होते. तो धागा पकडून रे यांनी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना पत्र पाठवले होते. ‘एमिली शेंकेल यांच्याशी आपले बोलणे झाले असून टोकियोच्या रेंकोजी मंदिरातील अस्थिकलशात ठेवलेल्या अस्थी नेताजींच्या असाव्यात असे त्यांना वाटत नाही. त्या अस्थी भारतात आणल्या जाव्यात, असेही त्यांना वाटत नाही,’ हे रे यांनी या पत्रात प्रारंभीच्या चार परिच्छेदांत नमूद केले होते. नंतरच्या परिच्छेदात ‘आपण नेताजींचे थोरले बंधू शरच्चंद्र बोस यांचे नातू असलो, तरी या विषयाचा खुल्या मनाने व अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला’ असल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘१९४५ साली कथित विमान अपघातात सुभाषबाबू मरण पावलेच नाहीत असे ठामपणे म्हणता येत नाही, असे आपले मत बनले असून ते अजूनही जिवंत आहेत असे सूचित करणाऱ्यांचे म्हणणे आपण साफ अमान्य करतो,’ असा खुलासा त्यांनी केला होता.

नवा आयोग नेमण्याच्या फंदात पडण्यापेक्षा एखाद्या जाणकार माणसाकडे सर्व नव्या-जुन्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निर्णायक अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवणे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने श्रेयस्कर ठरेल, असा सल्ला रे यांनी त्या पत्राद्वारे व्ही. पी. सिंग यांना दिला होता आणि ‘त्या’ विमान अपघातात नेताजी मरण पावले, असा दावा करणाऱ्या पुराव्यांमधील अंतर्गत विसंगती व परस्परविरोध दाखवून देणारे टिपण त्या पत्राला जोडले होते. हेतू अर्थातच तशी जबाबदारी आपल्याकडे यावी, असे सुचवण्याचा होता.

तर, मुद्दा हा की, रे यांनी आपली ऑगस्ट, १९९० मधील ‘ती’ भूमिका या पुस्तकात दडवून का ठेवली आहे? रे हे प्रामाणिकपणाने या विषयाचा सोक्षमोक्ष लावू इच्छित होते, तर मग पारदर्शक पद्धतीने आधीची भूमिका का बदलली, नवे कोणते पुरावे शोधून काढले, हे त्यांनी सप्रमाण दाखवून द्यायला हवे होते आणि तशा विवेचनाच्या ओघात, आमले यांनी ज्या षड्यंत्र सिद्धांतांचा ‘रद्दीच्या टोपलीत फेकण्याजोगे’ अशा हेटाळणीच्या शब्दांत उल्लेख केला आहे, ते सिद्धान्त थोडक्यात मांडून त्यांचे खंडन करायला हवे होते.

नेताजी १९४५ साली ऑगस्टमध्ये मांचुरियामार्गे सोव्हिएत युनियनला गेले. पुढे ते तिकडे तुरुंगात होते, वगैरे मांडणी करणारा सिद्धान्त पूर्वीपासूनच फेटाळला जात होता. त्याला पुन्हा चालना मिळाली ती १९९४ च्या मे ते सप्टेंबर महिन्यांत मॉस्कोच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय अभ्यासकांच्या गटातील पूरबी रॉय या रशियन भाषेच्या जाणकार सदस्यांना योगायोगाने गवसलेल्या नेताजींबद्दलच्या ताज्या सोव्हिएत लेखांमुळे! कोलकात्याच्या ‘एशियाटिक सोसायटी’तर्फे १९१७ ते १९४७ या कालखंडातील भारतीय क्रांतिकारकांच्या सोव्हिएत युनियनशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी त्या तिकडे गेल्या होत्या. त्यासंबंधीची कागदपत्रे न्याहाळताना त्यांना अनपेक्षितपणे नेताजी १९४५ नंतरही हयात असल्याचे दर्शविणारे उल्लेख सापडत गेले. तशी असंख्य कागदपत्रे पुढील काळात त्यांनी देशोदेशींच्या अभिलेखागारांतून मिळवली. त्यातील प्रमुख कागदपत्रांचा धांडोळा घेऊन ‘द सर्च फॉर नेताजी : न्यू फाइंडिंग्ज’ हे  पुस्तक लिहिले (प्रकाशक : पर्पल पीकॉक बुक्स अ‍ॅण्ड आर्ट्स प्रा. लि., २०११). त्याआधीही रॉय यांनी दिल्ली-कोलकात्यातील मान्यवर अभ्यासक-पत्रकारांच्या मेळाव्यात ही कागदपत्रे (या कागदपत्रांचे वजन ४० किलो भरले होते!) मांडली होती व याविषयी जनजागृती करण्याचे आपल्या परीने  प्रयत्नही केले होते. मुखर्जी आयोगासमोरची त्यांची साक्षही लक्षवेधी ठरली होती.

पूरबी रॉय यांचा, त्यांच्या या पुस्तकाचा, पुस्तकात उल्लेखिलेल्या आणि अनुवादित करूनही दिलेल्या कागदपत्रांचा तर्कशुद्ध प्रतिवाद रे यांनी आपल्या पुस्तकात करणे योग्य ठरले असते. मात्र प्रतिवाद सोडाच, त्यांनी रॉय यांची साधी दखलही घेतलेली नाही. नेताजींच्या मृत्यूभोवतीचे गूढ उकलण्यासाठी उत्सुक असणाऱ्या रे यांनी पूरबी रॉय यांच्याशी संपर्कच साधलेला दिसत नाही आणि तरीही आमले तो षड्यंत्र सिद्धान्त(?) ‘रद्दीच्या टोपलीत फेकण्याजोगा’ कसा आहे, हे रे यांच्या या पुस्तकात दाखवून देण्यात आले आहे, एवढेच नव्हे, तर ‘अपप्रचाराचे खांब उलथवून टाकणारी मांडणी त्यात आली आहे’ असे प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले आहेत!

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे १६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादला मरण पावलेले कुणी एक गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी हे नेताजीच होते, असा दावा म्हणा किंवा आमले यांच्या परिभाषेत ‘षड्यंत्र सिद्धान्त’ म्हणा, गेली कित्येक वर्षे चर्चिला जातो आहे. अशोक टंडन यांच्या ‘नये लोग’ या हिंदी वृत्तपत्रातील १७ लेखांकापासून ‘हिंदुस्तान टाइम्स’तर्फे वीर संघवी- अनुज धर प्रभृती पत्रकारांनी दोन वर्षे चालवलेल्या शोधमोहिमेपर्यंत असंख्य पत्रकारांनी हा ‘षड्यंत्र सिद्धान्त’ उचलून धरण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने या प्रकरणी दोन याचिकांची एकत्रित सुनावणी करून २०१३ साली उत्तर प्रदेश सरकारला बहुविध आदेश दिले. अखिलेश यादव यांच्या सरकारने २०१६ साली नाइलाजाने त्यातल्या काहींची तोंडदेखली अंमलबजावणीसुद्धा केली. हा संपूर्ण ‘षड्यंत्र सिद्धान्त’ रे यांनी विचारातच घेतलेला नाही. त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले त्याच सुमारास अधीर सोम या लखनौनिवासी तर्कशास्त्र्याने लिहिलेले  ‘गुमनामी बाबा : अ केस हिस्ट्री’ (प्रकाशक : ईबीसी) हे पुस्तकही प्रसिद्ध झाले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या १८ फेब्रुवारी २०१८ च्या अंकात या दोन्ही पुस्तकांचा परिचय प्रसिद्ध झाला आहे. रे यांना अधीर सोम यांचे पुस्तक उपलब्ध झाले नसणार हे स्पष्ट आहे, तथापि अधीरजींच्या पुस्तकात एका प्रकरणाच्या स्वरूपात छापलेले उच्च न्यायालयाचे निकालपत्र तर त्यांनी अभ्यासायलाच हवे होते. पुढील आनुषंगिक प्रवास, प्रत्यक्ष फैजाबादला भेट वगैरे प्रकारही त्यांनी करायलाच हवे होते. तसे काहीही न करताच त्यांनी आपल्या पुस्तकाला ‘लेड टू रेस्ट – द कॉण्ट्रोव्हर्सी ओव्हर सुभाषचंद्र बोस’स डेथ’ असे शीर्षक देण्याचा विचार केलाच कसा? आणि नेताजींच्या कन्या अनिता पाफ यांनी रे यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेच्या शेवटच्या परिच्छेदात ‘जर शक्य असेल तर रेंकोजी मंदिरातील अस्थींची डीएनए चाचणी घेतली जावी म्हणजे उरलेसुरले संशय दूर होतील,’ असे म्हणून मारलेली महत्त्वाची मेख आमले यांच्या नजरेतून सुटली तरी कशी?

गुमनामी बाबा प्रकरणाचा शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध सोक्षमोक्ष लागल्याशिवाय हे गूढ पूर्णपणे उकलणारच नाही, हे आमले यांनी ओळखायला हवे होते. तसे त्यांनी केले असते तर रे यांच्या पुस्तकाला असे अंतिम निर्णायक प्रमाणपत्र देण्याची धाडसी व अभिनिवेशी घाई त्यांनी केलीच नसती. रे यांच्या पुस्तकात नवे कोणते पुरावे सादर करण्यात आले आहेत, याचे विवेचन न करताच षड्यंत्र सिद्धान्त मांडत राहिलेल्या एकाही अभ्यासकाचे म्हणणे पूर्वपक्ष म्हणून वाचकांसमोर ठेवण्याचे साधे टीकासूत्र दुर्लक्षित करून सरसकट सर्वावर नेहरू-गांधीद्वेषाचे हेत्वारोप करणे त्यांनी टाळले असते.

rajhansprakashaneditor@gmail.com