औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांची ११०० पदे रिक्त असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजकुमार जैस्वाल यांनी गुरुवारी दिली. वैजापूर तालुक्यातील नायगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर भरवण्यात आली होती. मागील काही वर्षांपासून नायगव्हाण येथे एकच शिक्षक कार्यरत आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे सर्व विषय हे लोखंडे नावाचे एकच शिक्षक शिकवतात. आणखी एक शिक्षक नियुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण त्याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून नायगव्हाणच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर मुलांची शाळा भरवली. या पाश्र्वभूमीवर शिक्षणाधिकारी सूरजकुमार जैस्वाल यांनी सांगितले, की औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांची ११०० पदे रिक्त आहेत. शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. नायगव्हाण येथे २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. तेथेही दुसऱ्या शिक्षकाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न आहेत. माझी शाळा एकशिक्षकी नायगव्हाण येथील चौथीचा विद्यार्थी सूरज सोनवणे सांगत होता, ‘पहिली ते चौथीपर्यंत मी एकच शिक्षक पाहतो आहे. लोखंडे सरच पहिली ते चौथीचे सर्व विषय शिकवतात.’ तर पं. स. सदस्यांचे पती आनंद निकम म्हणाले, एकीकडे मराठी वाचवा म्हणायचे तर दुसरीकडे इंग्रजी शाळा कशा वाढतील, यासाठी प्रयत्न करायचे. अनेक वर्षांपासून नायगव्हाणची शाळा एकशिक्षकी आहे.’ या वेळी सरपंच ताराबाई खोसे यांचे पती गोिवद खोसे, उपसरपंच राधाकिसन सोनवणे, शालेय समितीचे संजय रतन खोसे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.