मनसेकडून बांगलादेशींना शोधण्यासाठी पाच हजाराचे बक्षीस औरंगाबाद : पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना शोधण्यासाठी मनसेकडून पाच हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी औरंगाबाद येथे मोहीम सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद येथे पूर्वी सिमी संघटनेचे अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले होते. त्यामुळे येथे असे नागरिक असू शकतील, म्हणून ही मोहीम हाती घेण्याचे ठरविल्याचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे, अशी रचना करणारे फलक राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. धार्मिक ध्रुवीकरण व्हावे असे प्रयत्न मनसेकडूनही सुरू करण्यात आले होते. पूर्वी भाजपने हा प्रश्न हाती घेतला होता. गुरुवारी महापालिकेच्याा सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून सत्ताधारी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे, याची आठवण राहावी म्हणून ही कृती केल्याचे भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनी सांगितले. भाजप आणि मनसेकडून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, अशी मागणी रेटली जात आहे. तर सत्ताधारी शिवसेनेकडून या मागणीसाठी पूर्वी निवेदने देण्यात आली होती. मात्र, सत्तेत असताना भाजपने व त्यांच्या नेतृत्वाने काही केले नाही, असा आरोप केला जात आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण व्हावे, असे प्रयत्न भाजप,सेना आणि मनसेकडून वेगवेगळय़ा पद्धतीने केले जात आहेत. पाकिस्तानी आणि बांगलादेशींचा शोध हा देखील याच मोहिमेचा भाग असल्याचे मानले जात आहे.