बंदी मोडल्यास ‘धपाटय़ाचा दंड’ भांडताना, राग व्यक्त करताना आणि अगदी एखाद्याबरोबरचे प्रेम व्यक्त करतानाही ‘शिवी’चा वापर सहजपणे केला जातो. ग्रामीण भागात तर भांडणामध्ये इरसाल शिव्यांची लाखोलीच असते. उच्चशिक्षित सार्वजनिक जीवनात काम करणारेही अनेकदा जाहीरपणे शिव्या देतात. शिव्यांमध्ये अनेकांचा उद्धार करण्याचीच पध्दत असल्याने केवळ शिवी दिली म्हणून रक्तरंजित भांडणे झाल्याची उदाहरणे आहेत. अशा वातावरणात कानडीमाळी गावातील काही तरुणांनी गावात ‘शिवी बंदी’ अभियान सुरू केले असून शिवी देणाऱ्याच्या पाठीत एक धपाटा आणि दंड केला जात असल्याने गावातून शिवी हद्दपार होऊ लागली आहे. बीड जिल्ह्य़ात ग्रामीण भागासह शहरी भागातही सर्वसाधारणपणे एकमेकांशी बोलताना सर्रास शिव्यांचा वापर होतो. चार मित्र एकत्र आल्यानंतर तर एकमेकांवर शिव्यांचे वारच होतात. मित्रांमधील जवळीकता ही शिव्यांवर ठरविली जाते. भांडणामध्ये तर अस्सल गावरान शिव्यांची लाखोलीच असते. क्षुल्लक कारणावरुन शिव्या दिल्यामुळे अनेक गावात एकमेकांचे डोके फोडल्याच्या घटना कमी नाहीत. मोठय़ा माणसांकडून होत असलेल्या शिव्यांचा वापर नकळतपणे लहान मुलांमधूनही सुरू होतो. ग्रामीण भागात पाच ते सात वर्षांची मुलेही शिव्या हासडतात. अशा वातावरणात केज तालुक्यातील कानडीमाळी या गावाने शिवी बंदी अभियान सुरू केले आहे. तीन हजार लोकसंख्येचे हे गाव उत्तम शेती करणारे म्हणून ओळखले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून शिवी बंदीमुळे हे गाव चच्रेत आले आहे. सरकार वेगवेगळे अभियान राबवते. मात्र, या गावाने शिवीबंदी अभियान सुरू केले आहे. लहान मुलांवर शिव्यांचा विपरीत परिणाम होतो. शिव्यांमध्ये मुली आणि महिलांचा अवमान केला जातो. त्यामुळे शिवी बंद करण्याचा निर्णय गावातील विश्वास राऊत यांनी तरुण मित्रांना एकत्र करुन सुरू केला. सरपंच राजेंद्र राऊत यांनी त्याला पाठबळ दिल्यानंतर मागील काही दिवसांपासून या गावात शिवी दिली की पाठीत धपाटा आणि दंड केला जातो. त्यामुळे गावातून आता शिवी जवळपास हद्दपारच होत असल्याचे सांगितले जात आहे.