शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

दहावीनंतर दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले जातात. ही गळती आहे, की इच्छेने शिक्षण सोडणारेही त्यामध्ये आहेत, याचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. पुढील तीन वष्रे असे सर्वेक्षण शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेतले जाईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. औरंगाबाद येथील विज्ञानविर्धिनी हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमासाठी ते येथे आले होते.

शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणारी ही मुले शिक्षणाची संधी नाही म्हणून शिकली नाहीत, असे नाही. संधीअभावी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्यांची संख्या फार तर १० टक्के असेल. मात्र, या अनुषंगाने अभ्यास करण्याची गरज आहे. दहावीतून उत्तीर्ण झालेले आणि ११ मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येवर सातत्याने तीन वष्रे लक्ष ठेवले तरच निष्कर्ष काढणे योग्य ठरेल. असे सर्वेक्षण या वर्षीपासून हाती घेतले जाईल, असेही तावडे म्हणाले. अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जावर दहावीच्या परीक्षेचा क्रमांक टाकण्यासाठी रकाना उपलब्ध करून दिला जाईल. त्यातून मधून हरवलेल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शिक्षण सोडण्याची कारणे विचारु, असेही तावडे यांनी सांगितले. दहावीनंतर अनेक जण रोजगार आणि शेतीमध्ये जातात. त्यामुळे त्यांची गळती झाली आहे, असे म्हणता येणार नाही. त्यातील किती जण इच्छेने शिक्षण सोडणारे आहेत, हे तपासावे लागेल. त्यासाठी शिक्षण विभाग विशेष सर्वेक्षण हाती घेईल.

प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या महाविद्यालयांच्या मंजुऱ्या कायदेशीरच

कोणत्या महाविद्यालयाना मंजुरी द्यायची याचे निकष या सरकारच्या काळात ठरविलेले नाहीत. ते आघाडी सरकारच्याच कालावधीमधील आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नातेवाईक विश्वस्त असणाऱ्या महाविद्यालयांना मंजुरी देताना एक टक्काही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. नियम डावलून मंजुरी दिली आहे, असे ज्यांना वाटते त्यांनी त्यास न्यायालयात आव्हान द्यावे, असेही तावडे म्हणाले. निकषात बसणाऱ्याच महाविद्यालयांना मंजुरी दिल्याचा दावा त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शिफारस केलेल्या महाविद्यालयांपैकी मंजुरी मिळालेल्या सर्व संस्था प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नातेवाईकांशी संबंधित होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते.

गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला जावा, अशी मांडणी होते. त्यावर शिक्षण विभागात काही काम सुरू असताना दिसत नाही. या अनुषंगाने बोलताना तावडे म्हणाले, की अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश असावा असे म्हणणे लोकप्रिय ठरू शकते. पण त्याची अंमलबजावणी करणे अवघड आहे. त्यामुळे कौशल्य विकास मंत्रालयाशी चर्चा करून काही अभ्यासक्रम दहावीनंतर करता येतील का, याची चाचपणी केली जाईल  –विनोद तावडे, शिक्षण मंत्री