उद्यापासून (मंगळवार) सुरू होत असलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागीय मंडळातून १ लाख ८१ हजार ५७८ परीक्षार्थीनी नोंद केली आहे. २९ मार्चपर्यंत होणाऱ्या या परीक्षेची विभागीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने जय्यत तयारी केली आहे.
औरंगाबाद जिल्हय़ातून सर्वाधिक ६४ हजार ६६८ परीक्षार्थी असून, यात ३७ हजार ३८९ विद्यार्थी, तर २७ हजार २७९ विद्यार्थिनी आहेत. बीड जिल्हय़ातून ४२ हजार ४०, परभणी २९ हजार ३०, जालना २९ हजार १४१, तर हिंगोली जिल्हय़ातून १६ हजार ६९९ परीक्षार्थी आहेत. औरंगाबादेत ७८४ माध्यमिक विद्यालयांसाठी २०२ परीक्षा केंद्रे आहेत. बीड ६३६ विद्यालयांसाठी १४५ परीक्षा केंद्रे, जालना ३६५ विद्यालये ८४ परीक्षा केंद्रे, परभणी ४२३ विद्यालये ८६ परीक्षा केंद्रे, तर हिंगोली २०७ विद्यालये ४५ या प्रमाणे विभागात एकूण ५६२ परीक्षा केंद्रे आहेत. एकूण परीक्षार्थीमध्ये १ लाख ७४ हजार २७७ नियमित, तर ७ हजार ३०१ पुनर्परीक्षार्थी आहेत.