छत्रपती संभाजीनगर: आम्ही कोणाला लबाड म्हटले नव्हते. पण त्यांनीच तो रंग स्वत:ला लाऊन घेतला. तेव्हा तुम्ही दररोज पाणी देऊ असे आश्वासन दिले हाेते. त्याची वचनपूर्ती करता येत नसेल तर राजीनामा द्या, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन केली. ‘लबाडांनो पाणी द्या’ या गेल्या ३४ दिवसापासून सुरू असणाऱ्या आंदोलनाचा समारोप शुक्रवारी मोर्चा काढून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, ज्योती ठाकरे, राजू वैद्य आदींची उपस्थिती होती.

‘नुसते ओरडून भाषण करुन चालत नाही. काम करावे लागते. आरोप करुन, नाती पांगवून, भांडणे लावून सरकार चालत नाही. त्यासाठी काम करावे लागते, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर टीका केली. भाजप हाच पाणी प्रश्नातील ‘ लबाड’ असल्याचे त्यांनी सांगितले. कधी नव्हे एवढे सरकारला बहुमत आहे. पण या सरकारमधील मंत्र्यामध्ये भांडणे आहेत. कोणी पालकमंत्री करा म्हणून भांडत आहे.कोणी चांगला बंगला हवा म्हणून वाद घालत आहे. कोणी आपला रुबाब जास्त हवा म्हणून तुम्हाला व्यस्त ठेवले जात आहे. पण यातून वेळ काढून जरा सर्वसामांन्याचे प्रश्न सोडवा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून केले.

राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. गुन्हेगारी वाढली आहे. पण गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना पावन करून घेतले जात आहे. त्यांना भाजप धुण्याच्या यंत्रातून बाहेर काढले जात आहे. त्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. त्यांना मोकळीक दिली तर गुन्हेगारी दोन दिवसात थांबेल, असेही ठाकरे म्हणाले.

या मोर्चात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची पाणी मोर्चातील ध्वनीफित ऐकवली. दररोज पाणी देऊ म्हणणारे मंडळी बेईमान आणि लबाड आहेत. आम्ही भाजपला लबाड म्हणालोच नाही. पण त्यांनाच मिरच्या झोंबल्या. आता जे ७२ व्या मजल्यावर २२ हजार चौरस फुटाचे घर घेऊन राहतात, त्यांना १२-१३ दिवसाला पाणी आल्यानंतर काय त्रास होतो, हे कळेल, असे म्हणत त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना टोला लगावला.

आदित्य ठाकरे यांनीही शिरसाट यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, संभाजीनगरमध्ये कचऱ्याचे आंदोलन सुरू असताना मदत केली. निधीही दिला. पण कोणी कोणी हात मारुन ७२ व्या मजल्यावर घरे बांधले आहेत. पण सत्तेत असताना रस्त्यांना निधी दिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या वेळी चंद्रकांत खैरे यांचेही भाषण झाले. मोर्चात कोरडे हंडे घेऊन अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.चौकट

साबण लावलेला शिवसैनिक मोर्चात

मार्चाच्या सुरुवातील ‘लबाडानो पाणी द्या’ अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक. त्या मागे डोक्यावर हंडे घेतलेल्या महिला, हातात फलक घेऊन आदित्य ठाकरे शहरातील क्रांती चौकापासून चालत या मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये साबणाचा फेस लाऊन अर्धवट अंघोळ करुन बाहेर आला आहे, असा शिवसैनिकही सहभागी झाला होता. दाढीचा फोम वापरुन शहरातील पाण्याची समस्येचे गांभीर्य समोर ठेवण्यात आले.

असे आहेत शिवसेनेचे प्रश्न?

१६८० कोटी रुपयांची योजना कोणत्या कारणासाठी २७४० कोटी रुपये करण्यात आली ?

१०६० रुपयांची वाढ कोणाच्या सांगण्यावर आणि कोणाच्या फायद्याची ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या योजनेसाठी ८५० कोटी रुपयांचे न परवडणारे कर्ज महापालिकेच्या डोईवर कशासाठी ?