छत्रपती संभाजीनगर : मृग नक्षत्रातील पहिले दोन दिवस कोरडेच गेलेले असले, तरी शेतकरी पेरणीसाठी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. मात्र, मशागत बरीचशी पूर्ण झालेली असून, वेचणी, पाळ्या घालण्यासाठी महानगराजवळील गावांमधील शेतकऱ्यांना शेतमजुरांचा ‘तूट काळ’ अनुभवावा लागत आहे.
पेरणीपूर्व मशागत ही पूर्णपणे निरोगी करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. वावरामध्ये एक काडीही दिसू नये, यावर कटाक्ष असतो. त्यासाठी वेचणी आवश्यक असून, शेतमजुरांशिवाय त्याला यांत्रिकीचा कुठलाही मार्ग नाही. वावरामध्ये वेचणी चांगल्या पद्धतीने झाली नसेल, तर पिकावर खरपाड नावाचा रोग पडतो, अशी शेतकऱ्यांची समजूत आहे. त्यामुळे मजुरांकडूनच वेचणी, औत हाकणे, पाळ्या घालणे आदी कामे करून घेण्यात येतात. मात्र, ग्रामीण भागात, विशेषत: महानगराजवळील खेड्यांमध्ये शेतमजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. महानगराजवळील खेड्यांमधील माणूस शहरात येऊन कंपन्यांमध्ये काम करत असून, इतरही अनेक पर्याय त्यांच्यापुढे असल्याने शेतमजुरांची तीव्र चणचण भासत आहे. खेड्यांमध्ये पुरुष शेतमजुराला ५०० रुपये, तर महिलेला ३०० रुपयांचा रोजगार मिळतो. तेवढाही शेतकऱ्यांना परवडत नाही. परंतु यापेक्षा अधिक रोजगार कंपन्यांमध्ये मिळत असल्याने ग्रामीण भागातील मजूर शहरांकडे जात असल्याचे शेतकरी विश्वंभर हाके यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेरणीच्या क्षेत्रात गतवर्षी ६.८५ लाख हेक्टरचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र होते. यंदा मे अखेरच्या आठवड्यापर्यंतच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार ते ७ लाख हेक्टर दर्शवण्यात आले आहे. तर प्रस्तावित खरीप क्षेत्र ६.९१ लाख हेक्टर आहे. गतवर्षी ६.७५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. मागील काही वर्षांमध्ये शेतीत शेतकऱ्यांसाठी मजुरांची जुळवणी करण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.