छत्रपती संभाजीनगर : ‘सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालया’च्या कनिष्ठ विभागातील सहशिक्षक आणि भाषाअभ्यासक डॉ. नागेश अंकुश यांच्या ‘अक्षरमात्र तितुकें नीट’ या भाषाविषयक पुस्तकाची निवड कर्नाटकातील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून करण्यात आली आहे. प्रमाण मराठी लेखन क्षेत्रात दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून लेखन करणारे अंकुश यांचे हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
या पुस्तकात प्रमाण मराठी लेखनशैलीतील बारकावे, लेखनातील अचूकतेचे नियम आणि लेखनाच्या तत्त्वांचे सोप्या भाषेत विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरत आहे. यापूर्वीही डॉ. अंकुश यांची ‘मराठी शुद्धलेखन’, ‘मराठी लेखनकला : तंत्र व मंत्र’, ‘उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ ही भाषाविषयक पुस्तके, तसेच ‘गाथा मुक्तिलढ्याची’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
सध्या त्यांचा ‘मागोवा-प्रमाण मराठी भाषेच्या निर्दोष लेखनाचा इतिहास’ हा ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे. चारशे वर्षांच्या प्रमाण मराठी लेखनपरंपरेचा अभ्यास अधोरेखित करणारा हा ग्रंथ, प्रमाण मराठीच्या जडणघडणीकडे ऐतिहासिक व भाषिक दृष्टिकोनातून पाहणारा पहिला सखोल अभ्यास ठरणार आहे. अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिनेश वकील यांनी अंकुश यांचे अभिनंदन केले आहे.