छत्रपती संभाजीनगर : देशातील झऱ्यांची पहिली गणना १५ मे पासून सुरू करण्यात आली आहे. गावस्तरावर झऱ्यांचे प्रवाह माहीत असल्यास भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.२०२३-२४ च्या कृषी वर्षाला संदर्भ वर्ष म्हणून मानून झऱ्यांची गणना केली जात आहे. हे काम आगामी वर्षभर चालणार आहे. ही गणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जात आहे. मोबाईल अप्लिकेशनद्वारे विदा गोळा केला जात आहे. गाव आणि वॉर्ड हे गणनेचे प्राथमिक क्षेत्र एकक असणार आहे.

जंगलात असलेले झरे जवळच्या गावात/वॉर्डमध्ये घेतले जातील. नीती आयोगाच्या कार्यगटाच्या अहवालानुसार, देशभरातील सुमारे २० कोटी लोक झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. प्रामुख्याने भारतीय हिमालयीन प्रदेश, पश्चिम घाट (सह्याद्री पर्वतरांगा, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू), पूर्व घाट (उत्तर ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू) आणि मध्य भारतातील अनेक भागातील अहवालानुसार देशातील १५ टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा भागांमध्ये ग्रामीण समुदायांच्या पिण्याच्या आणि घरगुती पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक झरे हा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे त्याची गणना केली जात आहे. देशात सद्यस्थितीत जलस्रोतांसाठी गणना सुरू आहे. त्यात झऱ्यांची पहिली गणना, पाटबंधारे विभागामार्फत लघु प्रकल्पांची ७ वी गणना, जलशयांची दुसरी गणना, मोठ्या व मध्यम प्रकल्पांची पहिली गणना होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात आतापर्यंत आढळले १३ झरे

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या गणनेत १३ झरे आढळून आले आहेत. त्यात सिल्लोड तालुक्यात २, फुलंब्री तालुक्यात १, खुलताबाद तालुक्यात ४, कन्नड तालुक्यात ६ झरे आढळून आले आहेत. अद्याप गणना सुरू आहे. ब्रिटीश राजवटीत संपूर्ण देशाच्या मोजणीचे आणि भुपृष्ठ नकाशे तयार करण्याचे काम १९१० मध्ये सुरू करण्यात आले होते. त्यावेळी काही झऱ्यांच्या नोंदी ह्या त्या नकाशांवर आहेत. कालौघात त्यातील काही झरे लुप्त होतात किंवा काही मार्ग बदलतात. त्याचीही तपासणी या गणनेत होईल, असे सहायक भुवैज्ञानिक डॉ. आहेर यांनी सांगितले.