छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात विविध आठही जिल्ह्यांत पडणाऱ्या वळवाच्या पावसात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, सोमवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विविध ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातील हळद या गावी एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. उमेश उत्तम उंडाडे, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर अंबाजोगाईजवळील मोरेवाडी येथील एका मंदिर परिसरातही वीज कोसळली. मात्र, या घटनेत जीवितहानी झाली नाही.
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात चार ठिकाणी वीज पडून शेळ्या, म्हैस आणि गाय दगावल्याची माहिती तहसीलदारांनी कळवली आहे. जालना जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून पाऊस पडत असून, भोकरदन तालुक्यात दोन तरुणांचा वीज पडून मृत्यू झाला. गणेश जाधव (वय ३२) आणि सचिन बावस्कर (वय २८) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. याच तालुक्यात रविवारीही दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. सलग पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.