छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद मुक्तिसंग्रामातील २४४ हुतात्म्यांचे आणि शहीद जवानांचे स्मरण म्हणून अंबाजोगाईतील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरात वर्षभरात आणखी एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. हा उपक्रम गतवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने योगेश्वरी ग्रीन आर्मीकडून राबवण्यात आला. १७ सप्टेंबरपर्यंत वृक्षारोपणाचे विशेष अभियान राबवण्यात येते.
योगेश्वरी संस्थेच्या ३५ एकर परिसरात मागील काही वर्षात १३५ प्रजातीतील पाच हजार वृक्ष लावण्यात आले आहेत. त्याला ‘शहीद स्मृती ऑक्सिजन पार्क’ म्हटले जाते. यामध्ये वड, पिंपळ, लिंब, चिंच या पारंपरिक वृक्षांसह कापूर, शेंदूर, कुसुम, रुद्राक्ष, हिरडा, बेहडा, पारोसा पिंपळ अशी पाच हजारांवर वृक्ष येथे पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे जवळपास सर्वच वृक्ष हे देशी आहेत. दुर्मीळ झालेल्या कापराच्या वृक्षातून सुमारे अर्धा किलोमीटर गंध पसरतो. मुख्य कापूर हाच. रसायनविरहित. त्याला भीम कापूर म्हटले जाते, अशी माहिती ग्रीन आर्मीचे समन्वयक मेजर एस. पी. कुलकर्णी यांनी दिली.
सुरुवातीला राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) व नंतर ग्रीन आर्मीच्या माध्यमातून जेसीबी न लावता विद्यार्थी श्रमदानातून आणि लोकसहभागातून वृक्षारोपण करतात. या ठिकाणी नळदुर्गसह ७५ ऐतिहासिक ठिकाणे, गावांमधील माती, पाणी आणून वृक्षारोपण केले आहे. यापूर्वीच्या काही वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, प्रदीप पुरंदरे, पद्मश्री पोपटराव पवार, ब्रिगेडिअर दशरथ आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानेही अभियान राबवून त्याला संस्थेचे माजी अध्यक्ष डाॅ. खुरसाळे यांच्या मार्गदर्शनात लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचे मेजर कुलकर्णी यांनी सांगितले.
शेंदूर, कुसुम वृक्ष
मारुतीला लावण्यात येणारा शेंदूर हा त्या वृक्षाचाच. हा दुर्मीळ आयुर्वेदिक वृक्ष. याच्या केशरी रंगाच्या बिया रगडल्यानंतर त्यातून शेंदूर निघतो. ६ ते ७ फूट उंची असते. पार्कमध्ये १० शेंदूर वृक्ष असून, विविध भागांत ७५ शेंदूर वृक्षांचे वाटप केले आहे. कुसुम वृक्षही दुर्मीळ असून, १८ ते २० मीटर उंची असते. फुलांचा रंग पिवळसर-पांढरट तर फळाचा तपकिरी, बियांपासून तेल काढले जाते. मातीची धूप थांबवून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी कुसुम वृक्ष महत्त्वाचा आहे, असे मेजर कुलकर्णी यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात साधारणपणे ४ टक्केच वनक्षेत्र आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी ‘ऑक्सिजन पार्क’ची उभारणी केली. येथे मुक्तिसंग्रामातील २४४ हुतात्मे आणि शहीद जवानांच्या स्मृती वृक्षारोपणातून जपल्या जातात. कापूर, सिंदूर, कुसुमसह अनेक देशी आणि दुर्मीळ वृक्ष आढळून येतात. – एस. पी. कुलकर्णी, मेजर (निवृत्त).