औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या संपाचा फटका राज्यातील टपाल व्यवस्थेवर झाला असून गेल्या काही दिवसापासून सरासरी दोन हजार टपाल एक दिवसाआड पाठवावे लागत आहे. राज्यात जवळपास १६ हजारांहून अधिक टपाल कार्यालये असून ग्रामीण भागात जाणारे टपाल पोहोचणे आता अवघड होऊन बसले आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ७८ टपाल कार्यालयांपैकी २० टपाल कार्यालयातील टपाल एक दिवस उशिराने पोहोचत आहे. खासगी वाहनांची सोय करून टपाल व्यवस्था नीटपणे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बस सेवा बंद असल्याने टपाल व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे औरंगाबाद व जालना येथील वरिष्ठ डाक अधीक्षक जी. हरिप्रसाद यांनी मान्य केले. गेल्या महिनाभरापासून विलीनीकरणच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेवला असल्याने टपाल व्यवस्थेमध्येही अडथळे निर्माण झाले. रेल्वे रुळावर असणाऱ्या गावातील टपाल सेवा सुरळीत असली, तरी केवळ बसमार्गावर असणारी व्यवस्था काही दिवस कोलमडली होती. खासगी गाड्या तसेच डाक विभागच्या अतिरिक्त गाड्यामधून टपाल पाठविले जात आहे. पण त्यास उशीर होत आहे. यामुळे टपाल खर्चातही काहीशी वाढ झाल्याचे टपाल खात्यातील अधिकारी सांगतात. न्यायालयीन प्रकरणातील टपाल तसेच सरकारी टपाल अडकून राहिल्याने अनेकांची कामे खोळांबली आहेत. दरम्यान काही गावातील टपाल वितरण करणारे कर्मचारी स्वत:हूनही दुचाकीवरून घेत जात आहेत. सेवा अगदीच बंद पडली नाही. पण त्यावर परिणाम झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एसटीचा संप सुरू झाल्यानंतर काही दिवसांत तो संपेल असे वाटत होते. पण आता टपाल विभागाने सुविधा केल्या आहेत. पण सेवेची तत्परता कमी झाली आहे. ग्रामीण भागातील सरासरी दोन हजार टपाल एक दिवस उशिराने पाठविले जात आहे. - जी. हरिप्रसाद, वरिष्ठ अधीक्षक