औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटक केंद्रातील सुरक्षारक्षकाला मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी दिली. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अंबादास रोडमल राऊत (वय ५३) यांनी २४ फेब्रुवारी रोजी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी शेख शहारुख शेख नजीर (वय २७), अजीमखाँ सादिकखाँ (वय ३६) व शेख मुजीब शेख नूर (वय ४२, सर्व रा. वालसावंगी ता. भोकरदन) यांना ताब्यात घेतले. यातील आणखी आठ आरोपी फरार असून त्यांची माहिती ताब्यात घेतलेल्या तिघांकडून मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. अंबादास राऊत यांच्या फिर्यादीनुसार २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११ अनोळखी चोरट्यांनी त्यांनी मारहाण करून एका खोलीत डांबून ठेवले. दोन ट्रान्सफार्मरमधील कॉपर वायर व ऑईल, असा अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ताब्यात घेतलेल्या तिघांनी गुन्हा केल्याचे कबुल केले असून त्यांच्याकडून ४ लाख रुपये किमतीचे एक वाहनही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणाचा गुन्हा फर्दापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.