छत्रपती संभाजीनगर : अनेक वर्षांपासून शहराला वाढीव पाणी मिळण्याची असलेली प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. फारोळ्यात बांधण्यात आलेल्या २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची बुधवारी ऑगस्टपासून चाचणी घेतली जाणार आहे. ९०० मीमीची जलवाहिनीद्वारे शहराच्या पाणीपुरवठ्यात ६५ ते ७० एमएलडी वाढ होणार असून, शहराला दररोज साधारणपणे १७० ते १७५ एमएलडी पाणी मिळणार आहे. जीर्ण झालेली ५६ दशलक्ष लिटर क्षमतेची योजना बंद ठेवली जाणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ५६ व १०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या दोन्ही योजना जीर्ण झाल्या आहेत. या दोन्ही योजनांची मुदत संपल्यावरही या योजनांद्वारे शहराची तहान भागवली जात आहे. वारंवार जलवाहिनी फुटणे, तांत्रिक बिघाडामुळे निर्माण होणे, अचानक गळती लागणे, वीजपुरवठा खंडित होणे यासारख्या घटना वारंवार घडत असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने दहा ते बारा दिवसांआड नागरिकांना पाणी मिळते. सध्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहराच्या राबविण्यात येत असलेल्या २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेमधून १९३ कोटी रुपये खर्चाची ७५ एमएलडी पाण्यासाठी ९०० मिमीची योजना राबविण्यात आली. या योजनेसाठी फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे काम रेंगाळल्याने शहराला पाण्याची टंचाई सहन करावी लागली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत ही योजना पूर्ण करण्यासाठी ठेकेदार एजन्सीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. अखेर नऊशेची योजना पूर्ण क्षमतेने राबविण्यासाठी २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची चाचणी घेतली जाणार आहे.

फारोळा येथील २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची चाचणी घेण्याचे काम सुरू झाले आहे. आज मंगळवारी यामध्ये पाणी घेऊन ते स्वच्छ करण्यात आले. बुधवारपासून चाचणी सुरू होईल. साधारणपणे चार ते पाच दिवस चाचणी घेऊन त्यानंतर पूर्ण क्षमतेने नऊशेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला जाईल. -तुषार टेकवाडे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण