माळढोक Great Indian Bustard (Ardeotis nigriceps) हा गवताळ माळरानावर सापडणारा एक राजबिंडा पक्षी. या पक्ष्याला विगर्स या शास्त्रज्ञाने १८३१ साली जगासमोर आणले. मराठीत या पक्ष्याला ‘माळढोक’ असे अतिशय समर्पक नाव मिळाले आहे. माळावर सापडणारा ढोक (मोठा बगळा) म्हणजे ‘माळढोक’. योगायोगाने याच्या शास्त्रीय नावाची फोड Ardeotis म्हणजे मोठय़ा बगळ्यासारखा दिसणारा माळावरचा पक्षी अशीच होते. पण गंमत म्हणजे या पक्ष्याचा आणि बगळ्याचा दूरान्वयेही संबंध नाही.
यांची उत्क्रांती २० ते ३० लाख वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाली असावी असे मानले जाते. तेथून हा पक्षी युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडात गेला असावा. आज जगात याच्या सुमारे २५ जाती सापडतात. आजच्या घडीला माळढोक हा पक्षी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सापडतो. भारतात तो राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत सापडत होता. पण आता फक्त राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश इथेच तो सापडतो. बाकीच्या राज्यांतून तो आता नामशेष झाला आहे.
माळढोक प्रामुख्याने भारताच्या शुष्क भागातील गवताळ माळरानावर राहणारा पक्षी आहे. त्याला खुरटय़ा गवताचे ओसाड आणि निर्जन माळ आवडतात; जिथे त्याला दूपर्यंत दृष्टिक्षेप टाकता येतो. बहुतांशी अशा ठिकाणी माणसांचा आणि पाळीव जनावरांचा वावर कमी असतो. पण काही ठिकाणी तो शेती आणि माळरानांच्या चौकडीसारख्या अधिवासातही राहतो.
याचे सामाजिक जीवन अतिशय मनोरंजक आहे. माद्यांना आकर्षित करण्यासाठी नर पक्षी दरवर्षी एका विशिष्ट जागी उभा राहून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करतो. या जागेवर तो प्रभुत्व गाजवतो आणि आपली हद्द निश्चित करतो. मादीला आकर्षित करण्यासाठी डौलदार नृत्य करतो. यामधे तो स्वत:भोवती गिरकी घेतो, शेपूट उंचावतो आणि हुम्म असा आवाज काढतो. हा आवाज २-३ किमी अंतरापर्यंत ऐकू जाऊ शकतो. हा पक्षी बहुभार्या आहे. एक प्रमुख नर अनेक माद्यांशी मीलन करतो, पण पिल्लांच्या संगोपनात अजिबात भाग घेत नाही. मीलनानंतर मादी निर्जन ठिकाणी उघडय़ा जमिनीवर एक अंडे घालते आणि एकटीच उबवते. सुमारे २५ दिवसांनंतर अंडय़ातून पिल्लू बाहेर पडते. हे पिल्लू मग आपल्या आईबरोबरच फिरते आणि सुमारे ७५ दिवसांनी उडण्यासाठी सज्ज होते. सुमारे एक वर्षांने ते आईपासून स्वतंत्र होते. पण हा दीर्घकाळ चालणारा विणीचा हंगाम पिल्लांसाठी घातक असतो. अंडं उबवणीचे २५ दिवस आणि उडायला येईपर्यंतचे ७५ दिवस असे सुमारे १०० दिवस हे पिल्लांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. जन्माला आलेल्या सर्व पिल्लांपैकी सुमारे ५०% पिल्ले याच काळात मृत्युमुखी पडतात आणि फक्त २५% पिल्लेच प्रौढ होईपर्यंत जगतात.
या पक्ष्यांना मुख्यत्वेकरून दोन धोके आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष धोका आणि दुसरा म्हणजे त्यांचा नष्ट होणारा अधिवास. प्रत्यक्ष धोके मुख्यत: बेकायदेशीर शिकार, विजेच्या तारांना धडकून होणारे अपघाती मृत्यू, कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा, भटक्या कुत्र्यांकडून होणारी पिल्लांची आणि प्रौढ पक्ष्यांची शिकार आणि गुरांच्या पायदळी तुडवले जाण्यामुळे होणारा अंडय़ांचा आणि पिल्लांचा नाश हे आहेत. दुसरा धोका म्हणजे त्यांचा नष्ट होणारा अधिवास. ही एक जटिल समस्या आहे. शेती आणि उद्योगधंद्यासाठी माळरानांचा मोठय़ा प्रमाणात नाश होत आहे. माळरानांच्या अयोग्य आणि अशास्त्रीय नियोजनामुळे ती आता संपुष्टात येत आहेत. माळढोकला लागणाऱ्या अधिवासाच्या फक्त १% माळरान आता संरक्षित आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार माळढोकची संख्या आता फक्त २५०-३०० इतकीच उरली आहे. त्यामुळेच याची गणना अतिसंकटग्रस्त पक्ष्यांमध्ये केली जात आहे. जर असेच चालू राहिले तर येत्या दशकात हा पक्षी नामशेष होईल, यात संशय नाही.
याला वाचविण्यासाठी आतापर्यंत बरेच प्रयत्न केले गेले, ज्यात अधिवासाचे संरक्षण हा एक घटक होता. पण त्यांच्या सतत घटणाऱ्या संख्येमुळे आता बंदिस्त प्रजनन संरक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. परंतु हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांचा अधिवास महत्त्वाचा आहे. जर अधिवासाच नसेल तर हा पक्षी कोणीही वाचवू शकणार नाही.
(छायाचित्र – राहुल वंजारी) girishjathar@gmail.com