भारतातील सर्वात मोठे एकात्मिक ऊर्जा उपयोगिता महामंडळ आणि देशातील दुसरी सर्वात मोठी राष्ट्रीय तेल आणि वायू कंपनी यांनी अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित (NTPC) आणि ऑइल इंडिया (Oil India) मर्यादित या ऊर्जा क्षेत्रात कार्य करणाऱ्या कंपन्यांनी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि डेरिव्हेटिव्ह्ज तसेच भू-औष्णिक ऊर्जेचा उपयोग वाढवण्याबरोबर डीकार्बोनायझेशन म्हणजेच कार्बनडाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी करणे किंवा शून्य करण्याच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य करारामुळे कार्बन ‘सिक्वेस्ट्रेशन’ सारख्या आधुनिक ‘डिकार्बोनायझेशन’ तंत्रज्ञानावर आधारित ज्ञान आणि अनुभवाची देवाणघेवाण करणे सुलभ होणार आहे.

हेही वाचाः मोठी बातमी : उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदाचा दिला राजीनामा

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून या दोन दिग्गज महारत्न कंपन्यांचा अक्षय उर्जेच्या क्षेत्रात आपला सहभाग वाढवण्याचा आणि वर्ष २०७० पर्यंत देशाचे ‘नेट झिरो’ उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी शाश्वत उपाय शोधण्याचा मानस आहे. एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग ऑइल इंडिया कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. रणजित रथ आणि या कंपन्यांचे इतर कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर नवी दिल्लीत स्वाक्षरी करण्यात आली.

हेही वाचाः टाटा समूहाला आणखी एक यश, एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाला CCI कडून ग्रीन सिग्नल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनटीपीसी सन २०३२ पर्यंत ६० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. हरित हायड्रोजन तंत्रज्ञान आणि ऊर्जा साठवण क्षेत्रात एक प्रमुख कंपनी बनण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. हायड्रोजन ब्लेंडिंग, कार्बन कॅप्चर आणि फ्युएल सेल, बसेस यासारख्या डिकार्बोनायझेशनच्या दिशेने कंपनीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.