नवी दिल्लीः भारताविरोधात पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीयेबद्दल देशभरात जनमानस तीव्र बनले असताना, निती आयोगाने सोमवारी दिलेल्या एका अहवालात मात्र तुर्कीयेकडून राबविल्या जात असलेल्या कार्यक्रमाची स्तुती करण्यात आली आहे. भारताच्या मध्यम उद्योगांमध्ये आढळणाऱ्या कौशल्याच्या तुटीला भरून काढण्यासाठी जागतिक सर्वोत्तम पद्धती म्हणून तुर्कीयेच्या प्रारूपाला स्वीकारले जाऊ शकते, अशीही या अहवालाची शिफारस आहे.

‘मध्यम उद्योगांसाठी धोरण सज्जता’ या शीर्षकाच्या अहवालात मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅनडा, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त तुर्कीयेच्या कार्यक्रमाचे कौतुक केले गेले आहे. अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘तुर्कीयेच्या ई-अकादमी कार्यक्रमाद्वारे वेळ आणि जागेच्या मर्यादांशिवाय प्रभावी, सोपे आणि लवचिक उद्योजकता प्रशिक्षण साध्य करण्यासह, महिला, तरुण आणि अपंग उद्योजकांना प्राधान्य दिले जाते. तेथील ‘कोसजेब’ हे उद्योजकतेवर दूरस्थ प्रशिक्षण प्रदान करते.’

उल्लेखनीय म्हणजे, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल तुर्कीयेविरोधात भारतीय जनमानसांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. शिवाय भारताच्या विमान वाहतूक सुरक्षा नियामकांनी महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कारणांवरून तुर्कीयेची कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली गेली असताना, निती आयोगाच्या ताज्या अहवालाचे हे निरीक्षण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ई-अकादमी हे तुर्कीयेचे एक ऑनलाइन प्रशिक्षण व्यासपीठ आहे जी अनुदानित अभ्यासक्रम प्रदान करते, ज्यामुळे प्रदेशांमधील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी इच्छित कुशल मनुष्यबळ मिळविले जाते, असे निती आयोगाचे अहवालाचे निरीक्षण आहे. ‘ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम अनुदानित दराने आणि उपेक्षित गटांसाठी (तुर्कीयेच्या ई-अकादमीमध्ये प्रदान केल्याप्रमाणे) मोफत दिले जाऊ शकतात, असे अहवालाने नमूद केले आहे. सध्या जागतिकीकृत बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी मध्यम उद्योगांना उद्योगाच्या गरजांशी जुळवून घेणारा आणि स्पर्धात्मक, कुशल कर्मचारी वर्ग सुनिश्चित करणारा कौशल्य विकासासाठी तयार केलेला, विदा-चालित दृष्टिकोन आवश्यक आहे.