इराणला पाठविण्यात येणारा एक लाख टन बासमती तांदूळ तेथे सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय बंदरात अडकून पडल्याची माहिती ऑल इंडिया राइस एक्स्पोर्टर्स असोसिएशनने सोमवारी दिली. दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय वाणिज्य मंत्री ३० जूनला बैठक घेणार आहेत. भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीपैकी १८ ते २० टक्के निर्यात ही इराणला होते. इस्रायल-इराण युद्धामुळे भारतीय बंदरात इराणला पाठविण्यात येणारा एक लाख टन तांदूळ अडकून पडला आहे. हा तांदूळ प्रामुख्याने गुजरातमधील कांडला आणि मुंद्रा या बंदरात पडून आहे, असे याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष सतीश गोयल यांनी स्पष्ट केले.

आखातातील संघर्षामुळे इराणला जाणारी मालवाहू जहाजे उपलब्ध नसून, त्यांना सध्या विमा संरक्षणही मिळत नाही. कारण आंतरराष्ट्रीय संघर्षांचा समावेश जहाज वाहतूक विम्यात होत नाही. त्यामुळे निर्यातदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

तांदळाच्या निर्यातीस होणारा विलंब आणि त्याच्या देयकाबाबतच्या अनिश्चिततेमुळे निर्यातदारांवर वित्तीय ताण येऊ शकतो. बासमती तांदळाचा भाव देशांतर्गत बाजारपेठेत आधीच प्रति किलो ४ ते ५ रुपयांनी कमी झाला आहे. कृषी निर्यात प्रोत्साहन संस्था ‘अपेडा’कडे याबाबत असोसिएशनने संपर्क साधला आहे. याप्रकरणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल हे ३० जूनला बैठक घेऊन त्यावर चर्चा करणार आहेत, असे सतीश गोयल यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ

भारतीय बासमती तांदळासाठी सौदी अरेबियानंतर इराण ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे. भारताने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १० लाख टन तांदूळ इराणला निर्यात केला. गेल्या आर्थिक वर्षात भारताने ६ लाख बासमती तांदूळ निर्यात केला. त्यात प्रामुख्याने आखाती देश आणि पश्चिम आशियाई देशांचा समावेश आहे. इराक, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेत भारताकडून तांदळाची जास्त निर्यात केली जाते.