नवी दिल्ली : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने भारतात सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे बुधवारी सूचित केले. व्यवसायाची मंदावलेली वाढ आणि वाढती स्पर्धा या आव्हानांचा सामना कंपनीला करावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स ९ ते १० टक्के मनुष्यबळात कपात करणार आहे.

हेही वाचा >>> रिझर्व्ह बँकेकडून ॲक्सिस, एचडीएफसी बँकेला दंड

ग्राहकांकडून उत्पादनांना कमी झालेली मागणी यासाठी कारणीभूत आहे. स्मार्टफोन हा कंपनीचा भारतातील मुख्य व्यवसाय आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी कंपनी किमती कमी करण्यासोबत नफा वाढवण्याची पावले उचलत आहे. कंपनीकडून खर्चात कपातीसोबत देशातील कामकाजाची पुनर्रचनाही केली जाऊ शकते. टीव्ही आणि अन्य घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे या विभागांचे एकत्रीकरण केले जाऊ शकते. या पुनर्रचनेमुळे आणखी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरात सध्या कंपनीत २,००० कर्मचारी कार्यरत आहेत. होऊ घातलेली कपात ही वेगवेगळ्या विभागात असणार आहे. त्यात मोबाइल फोन, ग्राहकोपयोगी वस्तू, घरगुती उपकरणे आणि ग्राहक सुविधा विभागांचा समावेश असेल. केवळ वरिष्ठ नव्हे तर कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांची देखील कपात केली जाणार आहे. कंपनीने आधीपासून नवीन कर्मचाऱ्यांची भरती थांबविली असून, रिक्त झालेल्या जागाही भरलेल्या नाहीत.